भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून त्यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संबंधी विचारलेल्या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली आहे. लंडनस्थित थिंक टँक चॅथम हाऊस येथे एका कार्यक्रमादरम्यान जयशंकर यांना पाकिस्तानी पत्रकार निसार यांनी विचारले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करू शकतात का? यावर जयशंकर यांनी स्पष्टपणे उत्तर देत म्हटले की, पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीरचा प्रश्न सुटेल.
कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का? यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. जर पाकिस्तानने काश्मीरातील एका भागावरील ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही. ते पुढे म्हणाले की, भारताकडून काश्मीरमधील सर्व गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपवून कलम ३७० हटवणं हे पहिले पाऊल होते. काश्मीरला आर्थिक सक्षम करत सामाजिक न्याय बहाल करणे हे दुसरे पाऊल होते. जास्त मतदानासह निवडणूक घेणे तिसरे पाऊल होते. आता काश्मीरचा तो भाग ज्यावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे ते परत घेणे बाकी आहे. जेव्हा ते होईल तेव्हा समस्या सुटेल असं त्यांनी सुनावले.
हे ही वाचा:
कौशंबीमधून बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्याला अटक
ट्रम्प यांचा हमासला अंतिम इशारा; ओलिसांना सोडा नाहीतर तुमचा अंत निश्चित!
खलिस्तान्यांकडून जयशंकर यांच्या ताफ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न
‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!
भारताच्या चीनसोबतच्या संबंधांच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, दोघांचाही इतिहास खूप जुना आहे. ज्यामध्ये कालांतराने चढ- उतार आले आहेत. आज दोन्ही देश संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आम्हाला एक स्थिर संबंध हवा आहे, जिथे आमच्या हितांचा आदर केला जाईल.