भावनगरमध्ये निर्माण होणार मोठे उत्पादन केंद्र
व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या कंटेनर उत्पादन क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भारत लवकरच गुजरातमधील भावनगर येथे मोठे कंटेनर उत्पादन केंद्र आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत उभारण्याच्या प्रयत्नात आहे.
जहाज बांधणी मंत्रायलयाने, भावनगर येथे कंटेनर उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत शक्याशक्यतेची चाचपणी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. लवकरच या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. सध्या जगभरात जल, रेल्वे अथवा रस्ते कोणत्याही मार्गाने मालवाहतूकीसाठी कंटेनर अतिशय उपयुक्त असल्यामुळे त्यांची मागणी सतत वाढत आहे.
भारतातही वाढता व्यापार आणि निर्यातीमुळे कंटेनरची मागणी वाढत असल्याचे बिझनेस लाईनमध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तात म्हटले आहे.
देशात सध्या दरसाल दहा हजार वीस-फुटी कंटेनरांचे उत्पादन होते. भारतात कंटेनरचा सर्वाधिक वापर करणाऱ्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून दरवर्षी सुमारे दोन ते अडीच हजार नव्या कंटेनरची मागणी नोंदवली जाते. एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहीतीनुसार, सध्या जवळ जवळ सर्व कंटेनर चीनकडून आयात केले जातात. त्यामुळे देशात पोहोचेपर्यंत त्यांची किंमत ४० टक्क्यांनी वाढलेली असते.
सद्यस्थितीत एकूण जागतीक कंटेनर उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. चायना इंटरनॅशनल मरिन कंटेनर (सी.आय.एम.सी) ही जगातील सर्वात मोठी कंटेनर उत्पादक कंपनी असून सिंगामास, कॉस्कॉ, सी.एक्स.आय.सी हे इतर उत्पादक आहेत. भारत सध्या सर्वच्या सर्व कंटेनर चीनकडून आयात करतो. एका कंटेनरची किंमत आकारमानानुसार ₹२३९,७६० ते ₹४५४,५४५ इतकी असते. भारताचा व्यापार २०२० च्या आर्थिक वर्षात वाढून $८३८.४६ इतका झाला होता. भारताला २०२१-२०२६ या काळात ६०,००० अधिक कंटेनरची गरज पडेल. ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने भावनगरमधील कंटेनर उत्पादन केंद्र महत्त्वाचे ठरेल.