संरक्षण मंत्रालयाने १०,५०० कोटी रुपयांच्या ‘आईज इन द स्काय’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पमुळे वैमानिकाच्या नजरेच्या टप्प्या पलिकडचा शत्रू हुडकून त्याचा वेध घेणे शक्य होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेत यामुळे चांगलीच भर पडणार आहे.
हवाई दलाला सुसज्ज करणा-या या महत्वाकांक्षी प्रकल्पात एवॅक (एडब्ल्यूएसी- एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल) सिस्टिमचा समावेश असणार आहे. या अंतर्गत सहा नवीन एवॅक सिस्टिम असलेली विमानं विकसित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यासाठी एअर इंडियाकडील एरबस ए३२० जेट्सची निवड करण्यात आली आहे.
फायटर विमानांच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झालेला आहे. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या स्टुका डाईव्ह बॉम्बर्सपासून ते अमेरिकेच्या बी-१७ फ्लायिंग फोर्ट्रेसपर्यंत अनेक शोध दुसऱ्या महायुद्धात लावले. आकाशात मिळवलेल्या वर्चस्वामुळेच मित्र राष्ट्रांना दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवता आला. आजही हवाई क्षेत्रातल्या दबदब्यामुळेच अमेरिका जगातील सर्वात बलशाली राष्ट्र आहे. ही हवाई क्षेत्रातील स्पर्धा आता हार्डवेअरपर्यंत मर्यादीत राहिलेली नसून सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनेक नवनवे प्रयोग फायटर विमानांची मारक क्षमता वाढवत आहेत. यातील एक नवा प्रयोग म्हणजे एवॅक (एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल). हवाई युद्धांचे निकाल हे आता बीव्हीआर (बियॉंड व्हिज्युअल रेंज) म्हणजे नजरेपलीकडील लक्ष्य वेधण्याचा क्षमतेवर ठरतात. याचाच विचार करून डीआरडीओने (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलडमेंट ऑर्गनायजेशन) १९९० च्या सुरवातीपासूनच एवॅक क्षमता विकसित करण्यासाठी प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी कॅब्स (सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम)ची स्थापना केली गेली होती. हा प्रकल्प ठरलेल्या कालमर्यादेच्या पलिकडे बराच लांबला.
२००४ पासून पुढे १३ वर्ष एम्ब्रेअर नावाच्या ब्राझिलियन कंपनी बरोबर काम चालू होते, आणि २०१७ मध्ये भारतीय हवाई दलाने पहिल्या सर्वेलन्स विमानाचा अधिकृत समावेश केला. परिणामी भारत हा अशी क्षमता असलेला जगातील चौथा देश बनला.
२०१९ च्या फेब्रुवारी मधील बालाकोट एअरस्ट्राईक दरम्यान ह्या एवॅक सिस्टिमचा फायदा भारतीय वायुसेनेला मिळाला. त्या हल्ल्यामध्ये जरी भारतीय हवाईदलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय विमानांचा उपयोग केला गेला असला तरी एवॅक सिस्टिमच्या मदतीनेच भारतीय मिग -२१ ला पाकिस्तानी एफ-२१ ने केलेला हल्ला परतवता आला.
त्यामुळे आता बिव्हिए युद्धामध्ये भारताला सुयोग्य आघाडी मिळाली आहे.