भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल या भीतीने पाकिस्तानी राज्यकर्त्यांना पुन्हा घाम फुटला आहे. हे भय इतके प्रचंड आहे की सौदीच्या दौ-यावर असलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना परदेशात पत्रकार परीषद घेऊन या भावनेला वाट करून द्यावीशी वाटली.
भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी अबू धाबी येथे पत्रकार परिषदेत केला. भारत यावेळी थेट पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. या विषयात आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.
” आय़एसआयने दिलेल्या माहितीनुसार भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. आम्हाला अशीही माहिती आहे की या स्ट्राईक साठी भारताला काही महत्वाच्या मित्र देशांकडून मान्यतेची अपेक्षा आहे. ” असे कुरेशी म्हणाले. “भारताला आम्ही सांगू इच्छितो की पाकिस्तान प्रतिकाराठी सज्ज आहे, आम्ही भारताला धूळ चारायला पूर्णतः सक्षम आहोत.” असंही ते म्हणाले.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात पठाणकोट, उरी अशा कुरावती काढून भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक करून भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्याचा पुनरावृत्तीच्या नुसत्या संशयाने पाकचे धाबे दणाणले आहेत.