१८ वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर आज (४ जून) आरसीबी संघ बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी परेड करत आहे. त्यापूर्वी स्टेडियमबाहेर एक दुःखद दुर्घटना घडली आहे. विजयी मिरवणूक पाहण्यासाठी चाहते स्टेडियमवर बाहेर जमले होते आणि मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २५ हून अधिक जखमी झाले आहेत. पोलीस गर्दीवर लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मंगळवारी एका रोमांचक सामन्यात पंजाब किंग्ज इलेव्हनचा पराभव केला आणि १८ वर्षांनंतर त्यांचा पहिला विजय नोंदवला. आरसीबीच्या या विजयानंतर, बेंगळुरूमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. संघाचा सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आज चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एक कार्यक्रम आयोजित केला होता.
या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मृतांची कबुली दिली, परंतु त्यांनी अधिक माहिती दिली नाही. “मी अद्याप आकडेवारीची पुष्टी करू शकत नाही. मी आता स्टेडियममध्ये जात आहे. भावनिक चाहते खूप आहेत… आम्ही ५,००० कर्मचारी तैनात केले होते,” असे त्यांनी इंडिया टुडेला सांगितले. गर्दी लक्षात घेता, बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (BMRCL) क्यूबन पार्क आणि डॉ. बीआर आंबेडकर विधान सौधा मेट्रो स्थानकांवरील सेवा दुपारी ४:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केल्या आहेत.
हे ही वाचा :
झाबुआ रस्ते अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
नरेंद्र मोदी, राजनाथसिंह यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांची भेट
अलाहाबाद उच्च न्यायालयाने राहुल गांधींचे कान उपटले; सैन्याची मानहानी करू नका!
“राष्ट्र सर्वोपरी”चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद!
दरम्यान, या घटनेवरून कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर भाजपाने आरोप केला आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचे भाजपाने म्हटले आहे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे भाजपाने म्हटले आहे.
