बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा आणि सांडपाणी अशा रोजच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना आज थेट आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळाली. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव येथील प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला.
या जनता दरबारात आमदार विद्या ठाकूर उपस्थित होत्या. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्षपणे सादर केल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. जनता दरबारात अवैध बांधकामे, रस्त्यावरील फेरीवाले, वाहतूक कोंडी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन या प्रमुख तक्रारी नागरिकांकडून पुढे आल्या.
गोरेगाव परिसरातील अवैध लॉज व्यवसायाने नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता एक समिती गठीत करून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश यावेळी मंत्री लोढा यांनी दिले.
तसेच स्थानिक परिसरातील रोहिंग्या आणि बांग्लादेशी फेरीवाल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील मंत्री लोढा यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, शहरातील प्रत्येक विभागात अशा जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत आहे, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष तोडगा निघू शकेल.
हे ही वाचा :
श्रीलंकेच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर
हमासने दिलेल्या इस्रायली बंधकांच्या मृतदेहांपैकी एक मृतदेह पॅलेस्टिनी
अफगाणिस्तान सीमेवर हिंसाचार; मध्यस्थीसाठी पाकची धावाधाव
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि प्रभावी उपाय करणं ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर तिथेच निर्णय घेऊन लोकांना दिलासा देणं आहे.”
