१०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी ‘आयुष्मान भारत’ आरोग्य खात्यांशी जोडल्या

१०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी ‘आयुष्मान भारत’ आरोग्य खात्यांशी जोडल्या

आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि डिजिटल आरोग्य सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने मोठे यश मिळवत, १०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी Ayushman Bharat Health Account (आभा) खात्यांशी जोडण्यात आल्या आहेत. राज्यांपैकी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांनी Ayushman Bharat Digital Mission (ABDM) अंतर्गत आरोग्य नोंदी जोडण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही उपलब्धी देशात एकात्मिक, नागरिक-केंद्रित आणि परस्परसंलग्न डिजिटल आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

ABDM चे एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही महिन्यांत या योजनेतील नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंदाजानुसार, गेल्या दीड वर्षात ही संख्या दुप्पट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “फेब्रुवारी २०२५ मध्ये ५० कोटींवर असलेली लिंक केलेल्या आरोग्य नोंदींची संख्या केवळ १५ महिन्यांत १०० कोटींहून अधिक झाली आहे. सध्या दर दोन ते तीन महिन्यांत सुमारे १० कोटी नवीन आरोग्य नोंदी आभाशी जोडल्या जात आहेत. सुरुवातीला १,००० पेक्षाही कमी नोंदींपासून सुरू झालेला हा प्रवास आज १०० कोटींहून अधिक नोंदींपर्यंत पोहोचला असून ABDM जगातील सर्वात मोठ्या डिजिटल आरोग्य परिसंस्थांपैकी एक बनला आहे.”

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत National Health Authority (NHA) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. ही प्रगती सरकारी आरोग्य योजना, राज्यस्तरीय आरोग्य प्लॅटफॉर्म, सार्वजनिक डिजिटल प्रणाली आणि खासगी आरोग्य तंत्रज्ञान भागीदारांकडून ABDM चा वाढता स्वीकार दर्शवते. सध्या ४५० हून अधिक सार्वजनिक आणि खासगी आरोग्य तंत्रज्ञान उपाययोजना ABDM परिसंस्थेशी यशस्वीरित्या एकत्रित करण्यात आल्या आहेत.

आभा ही एक अद्वितीय डिजिटल आरोग्य ओळख म्हणून कार्य करते. यामुळे नागरिकांना रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि इतर आरोग्य सेवा प्रदात्यांमधील आपले आरोग्यविषयक रेकॉर्ड सुरक्षितपणे जोडणे आणि त्यांचा वापर करणे शक्य होते. या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार बर्नवाल यांनी सांगितले, “१०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी आभाशी जोडल्या जाणे हा आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही कामगिरी सरकारी योजना, राज्य सरकारे, आरोग्य संस्था आणि खासगी तंत्रज्ञान भागीदारांमधील डिजिटल आरोग्य सेवांच्या वाढत्या वापराचे प्रतीक आहे. आभाशी जोडलेल्या आरोग्य नोंदी नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक माहितीस सुरक्षित आणि संमती-आधारित प्रवेश देतात, तसेच संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये उपचारांची सातत्यपूर्ण साखळी राखण्यास मदत करतात.”

Exit mobile version