घरबिजनेसभारतीयांनी परदेश प्रवासावर लावला ब्रेक!

भारतीयांनी परदेश प्रवासावर लावला ब्रेक!

मार्चमध्ये फॉरेन ट्रिपवरील खर्चात १६ टक्क्यांची घट

मध्य पूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता भारतीयांच्या परदेश प्रवासावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. मार्च महिन्यात भारतीयांनी परदेश दौऱ्यांवर केलेला खर्च मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती समोर आली असून, यामागे इराण-इस्रायल संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थिती आणि वाढलेले विमानभाडे ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. एकेकाळी उन्हाळी सुट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात विदेश दौरे करणारे भारतीय आता सुरक्षितता आणि खर्च या दोन्ही गोष्टींचा विचार करून प्रवासाचे नियोजन बदलताना दिसत आहेत.

दुबई, दोहा, अबुधाबी यांसारखे मध्य पूर्वेतील महत्त्वाचे ट्रान्झिट हब हे भारतातून युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मुख्य केंद्र मानले जातात. मात्र, संघर्ष वाढल्यानंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले किंवा निर्बंध लागू केले. त्यामुळे शेकडो उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या, तर काहींना मोठे वळसे घेऊन प्रवास करावा लागला. परिणामी प्रवासाचा कालावधी वाढला आणि विमान कंपन्यांचा इंधन खर्चही प्रचंड वाढला. त्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर झाला असून काही मार्गांवर विमानभाड्यात तब्बल ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा:
इराणकडून समृद्ध युरेनियम साठ्याचा त्याग करण्याची तयारी?

अमेरिका-इराण शांतता कराराची चांगली बातमी येणार?

होर्मुझपासून ऊर्जा संकटापर्यंत…

अंदमान समुद्रात मान्सूनची दमदार एन्ट्री

वाढत्या खर्चामुळे आणि युद्धाच्या भीतीमुळे भारतीय पर्यटकांनी परदेश प्रवासापासून काही प्रमाणात दूर राहण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः कुटुंबासोबत सुट्टीचे नियोजन करणाऱ्या मध्यमवर्गीय प्रवाशांनी परदेश दौरे रद्द करून देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. पर्यटन कंपन्यांच्या मते, मार्च महिन्यात युरोप आणि पश्चिम आशियाकडे जाणाऱ्या बुकिंगमध्ये मोठी घट झाली. अनेकांनी आपले टूर पॅकेज पुढे ढकलले, तर काहींनी संपूर्ण प्रवासच रद्द केला.

या परिस्थितीचा फटका भारतीय विमान कंपन्यांनाही बसत आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या कमी झाल्याने विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर दबाव वाढला आहे. दुसरीकडे काही विदेशी विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांचा फायदा घेत आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सतत वाढणारा इंधन खर्च, हवाई मार्गांवरील निर्बंध आणि घटलेली प्रवासी संख्या यामुळे विमान वाहतूक क्षेत्रासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय संघर्षामुळे पर्यटन उद्योगातही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल व्यवसाय आणि विमान कंपन्या यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्य पूर्वेतील परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर आगामी काही महिन्यांत परदेश प्रवासावरील भारतीयांचा खर्च आणखी घटू शकतो आणि त्याचा व्यापक परिणाम जागतिक पर्यटन आणि विमान वाहतूक उद्योगावर होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version