घरस्पोर्ट्स“तो षटकार… आणि भारत विश्वविजेता!”

“तो षटकार… आणि भारत विश्वविजेता!”

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २ एप्रिल हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे. २०११ साली याच दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एमएस धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकला होता.

या विजयासह भारताचा २८ वर्षांचा प्रतीक्षा संपुष्टात आला. १९८३ नंतर प्रथमच टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरले. या यशामुळे धोनी यांना भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळख मिळाली. यापूर्वी त्यांनी २००७ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून दिला होता.

फायनल सामन्यात धोनी यांनी नाबाद ९१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी मारलेला विजयी षटकार भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो.

सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. महेला जयवर्धने यांनी ८८ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या, तर कुमार संगकाराने ४८ धावांचे योगदान दिले.

प्रत्युत्तरात भारताने ४८.२ षटकांत ४ बाद २७७ धावा करत सामना ६ विकेट्सने जिंकला. भारताकडून गौतम गंभीर यांनी ९७, धोनी यांनी नाबाद ९१, विराट कोहली यांनी ३५ आणि युवराज सिंह यांनी नाबाद २१ धावा केल्या.

या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी धोनी यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला, तर संपूर्ण स्पर्धेत ३६२ धावा आणि १५ विकेट्स घेणाऱ्या युवराज सिंह यांना ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ घोषित करण्यात आले.

दरम्यान, भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २००३ मध्ये सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. २०२३ मध्येही भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

भारताने आतापर्यंत एकूण ४ वेळा वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली असून, त्यापैकी २ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version