मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियाओरा येथील २० वर्षीय बीएस्सी विद्यार्थी सुरेंद्र सिंह चौधरी, सोशल मीडियावर ‘बिट्टू तबाही’ या नावाने ओळखला जातो. अजनार नदीची दयनीय अवस्था पाहून त्याने केवळ प्रशासनाकडे तक्रार करण्याऐवजी स्वतःच नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत त्याने नदीत उतरून प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, शेवाळ आणि साचलेला कचरा स्वतःच्या हाताने बाहेर काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही मित्र त्याच्यासोबत होते; मात्र हळूहळू ते दूर झाले आणि बिट्टूने एकट्यानेच हे काम सुरू ठेवले.
नदी स्वच्छ करण्यासाठी बिट्टूने स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. कोणतीही मोठी यंत्रणा, सरकारी मदत किंवा विशेष साधनसामग्री नसताना तो तासन्तास नदीत उतरून कचरा बाहेर काढत राहिला. या कामामुळे त्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला, मात्र त्याने स्वच्छतेची मोहीम थांबवली नाही. एका घाटाची स्वच्छता करण्यासाठी त्याला तब्बल अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्याच्या कामाची ‘आधी आणि नंतर’ची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि एका तरुणाच्या जिद्दीने नदीचा परिसर किती बदलू शकतो, हे देशासमोर आले.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशच्या सागरमध्ये विषारी दारूमुळे ११ जणांचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान ३७६ गोविंदा जखमी
हिमालयाच्या पोटातून; ऋषिकेश – कर्णप्रयाग
दिल्लीत आता जाती धर्मावरून काड्या
बिट्टूच्या या प्रयत्नांचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही कौतुक केले होते. त्यानंतर त्याची कहाणी देशभर पोहोचली. मात्र, या यशामागे एक गंभीर प्रश्नही समोर आला आहे—नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ एका २० वर्षांच्या तरुणावर का यावी? आज बिट्टूचे काम लोकांसाठी प्रेरणादायी ठरत असले, तरी नदीत पुन्हा कचरा टाकणाऱ्या नागरिकांबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा उद्देश केवळ एक नदी स्वच्छ करणे नसून, लोकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची आणि पर्यावरणाची जबाबदारी निर्माण करणे हा आहे. एका तरुणाने प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत दाखवून दिलं आहे की, बदलाची सुरुवात मोठ्या यंत्रणेतून नव्हे, तर एका माणसाच्या जिद्दीपासूनही होऊ शकते.
