डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती आढळल्याने शासकीय कार्यालये, बांधकामस्थळे आणि अन्य आस्थापनांसह तब्बल २०८ ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये आठ शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. जुलैमध्ये १२०, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८८ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. रिकामे भूखंड, बांधकामस्थळे, बेसमेंट, भंगार डेपो, टायर दुकाने आणि छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
नाशिकमध्ये यंदा जूनपर्यंत डेंग्यूची परिस्थिती तुलनेने नियंत्रणात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ आणि जूनमध्ये ८ रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाले आणि जुलै महिन्यातच ३३ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत आणखी २९ रुग्ण आढळल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
हे ही वाचा:
राम मंदिर प्रसादाच्या नावाने फसवणूक; अॅमेझॉनला १ लाखांचा दंड
झेप्टोची डिलिव्हरी महागली; क्विक-कॉमर्समध्ये नवी शुल्कस्पर्धा
बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून मीठाऐवजी वाढली डिटर्जंट पावडर
श्रीलंकेत मानव सुथारने रचला विजयसेतू!
या पार्श्वभूमीवर मलेरिया विभागाने घराघरांत तपासणी, डासांच्या अळ्या शोधण्याची मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. मात्र, शहरात धूरफवारणी, फॉगिंग आणि अळीनाशक फवारणी केली जात असल्याचा प्रशासनाचा दावा असताना प्रत्यक्षात धूरफवारणी केवळ कागदावरच होत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आणि नागरिकांनीही घराभोवती पाणी साचू न देणे, हेच नाशिकसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
