पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी काही दिवसांपूर्वी जादवपूर युनिव्हर्सिटीत गेले होते. कार्यक्रम होता सामूहिक वंदे मातरम् गायनाचा. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत काही काळापूर्वी सुरू असलेले तुकडे तुकडे गँगचे आझादीवाले सर्व तमाशे इथेही चालत असतात. युनिव्हर्सिटीच्या भिंतींवर आझादीच्या घोषणा लिहिल्या होत्या. अशा घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेंदु यांनी चांगलेच फैलावर घेतले. ‘मी कचरा साफ करणारा माणूस आहे, हा कचरा मी स्वच्छ करणार’, असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत, हातचे काहीही राखून न ठेवता सांगितले. कचरासफाईची ही मोहीम देशभरात हाती घेण्याची गरज आहे. त्यापूर्वी हा कचरा म्हणजे नेमके काय? हे लक्षात घेण्याची गरज आहे. कॉकरोच आंदोलनात शिवराळ भाषेमुळे देशभरात बदनाम झालेल्या रुचिका सिंग या विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा गरळ ओकली आहे. कचरा सफाईची मोहीम देशभरात किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. शुभेंदु आझादीच्या घोषणा देणाऱ्या, बेताल वागणाऱ्या, देशविरोधी मानसिकता असलेल्या विद्यार्थ्यांना कचरा म्हणालेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही मानसिकता कोण्या एका राज्यापुरती मर्यादित नाही. देशभरात ती आपल्याला पाहायला मिळते. ती मर्यादित आहे, परंतु धोकादायक आहे. देशात रील्स करून पोट भरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यात काही गैर नाही. अन्य व्यवसायांसारखा हाही एक व्यवसाय आहे. हे रील बनवताना सामाजिक हित, राष्ट्रहित नजरेआड करू नये, तारतम्य बाळगावे अशा किमान अपेक्षा असतात. किमान कपडे वापरून, अश्लील कंटेंट देऊन आणि औकात नसताना एखाद्या बड्या व्यक्तीच्या विरोधात बरळून व्ह्यूज वाढवण्याचे प्रताप काही मंडळी करत असतात. रुचिका सिंग ही त्यातलीच एक. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अभद्र शिवीगाळ केली. लोक चिडले आहेत, प्रकरण अंगाशी येऊ शकते, शेकू शकते हे लक्षात आल्यानंतर ती माफी मागून मोकळी झाली. काही दिवस बया शांत होती. पुन्हा कोणीतरी चाव्या भरल्यानंतर मोदींच्या विरोधात तिने ताजा व्हिडिओ टाकला आहे. ‘माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मी आता शांत राहणार नाही’, असे ती म्हणते आहे. ‘लोक मला शिव्या घालतात, कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, कोणाला तोंड दाखवू शकत नाही’, याचे खापर ती मोदींच्या डोक्यावर फोडते आहे. देशाच्या सर्वोच्च लोकप्रिय नेत्याने मोठ्या मनाने तिला माफ केले. पण देशाची जनता तिची कर्मे कशी विसरेल? लोक शिव्या घालणारच.
