घरविशेषरोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

विजेतेपद मिळविल्यानंतर व्यक्त केला विश्वास

‘अरे, बादमें फोडो यार, वर्ल्डकप जितनेके बादमें फोडो’… भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामना संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अशी प्रतिक्रिया दिली. कोलंबोत पत्रकार परिषद सुरू असतानाच बाहेर फटाक्यांचे आवाज येत होते, या आवाजाचा अडथळा येत असताना रोहितने अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

 

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात केल्यानंतर रोहित शर्मा भलताच खूष होता. तेव्हा त्याने श्रीलंकेला येण्यासाठी भारतात विमान पकडण्यापासून ते अन्य चिंतांबाबत सांगितले. दीर्घविश्रांतीनंतर आलेला जसप्रीत बुमराह तसेच, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या फिटनेसबाबत शंका होती. त्यामुळे मधली फळी कशी काम करेल, याबाबत चिंता होती. मात्र रविवारच्या विजयामुळे सर्व काही सुरळीत चालले आहे, याची खात्री पटली आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही मिळाली आहे.

 

 

आशिया कपमध्ये विरोधी संघाच्या विविध पद्धतींशी सामना करता आला, याबाबत रोहितने आनंद व्यक्त केला. ‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची परिस्थिती चार बाद ६६ झाली असताना हार्दिक आणि इशानने संयमी खेळ केला. ज्या परिस्थितीत जसा खेळ त्यांच्याकडून अपेक्षित होता, तसा खेळ त्यांनी केला.  आम्ही ड्रेसिंग रूममध्ये अगदी आरामात होतो. आम्ही के. एल. राहुलला अगदी शेवटच्या क्षणी सांगितले होते की, तू अंतिम ११ खेळाडूंमध्ये आहेस. आणि त्याने आमची निवड सार्थ ठरवत शतक ठोकले. त्यानंतर विराटने ठोकलेले शतक आणि पाकिस्तानविरुद्धच कुलदीप यादवने केलेली गोलंदाजी याने या सामन्यावर कळस चढवला. तर, श्रीलंकेविरोधात आमच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर मी खूप खूष आहे, असे रोहितने सांगितले.

 

हे ही वाचा:

हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

 

कुलदीप यादवही स्वत:च्या गोलंदाजीवर भलताच खूश होता. ‘मला माझी आताची गोलंदाजी आवडली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. राहुलच्या पुनरागमनावरही बरेच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही माध्यमांतून स्वत:च्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले. राहुलनेही त्याला स्वत:ला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र त्याचे स्थान आता मजबूत झाले आहे, असे सांगितले.

 

 

अक्षर पटेल याला दुखापत झाल्याने भारतीय संघात चिंता निर्माण केली होती. मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे दुसरा पर्याय होता, असे दिसते. ‘अक्षरचे स्नायू दुखावले आहेत. कदाचित त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी एक आठवडा किंवा १० दिवस लागतील. तो ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकेल का, याबाबत मला शंका आहे,’ असे रोहित शर्माने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version