घरक्राईमनामामणिपूरमध्ये ओलीस ठेवलेल्या २१ नागा नागरिकांची सुटका

मणिपूरमध्ये ओलीस ठेवलेल्या २१ नागा नागरिकांची सुटका

कुकी ग्रामस्थ आणि सशस्त्र लोकांनी ठेवले होते ओलीस

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात कुकी ग्रामस्थ आणि सशस्त्र लोकांनी ताब्यात घेतलेल्या नागा नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. सर्व २१ नागा नागरिकांना गुरुवारी दीर्घ वाटाघाटीनंतर सोडण्यात आले. इंफाळ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, उखरुल- इम्फाळ रस्त्यावर तीन वाहनांमधून प्रवास करणाऱ्या तंगखुल नागा समुदायाच्या नागरिकांना बुधवारी दुपारी शांगकाई येथे कुकी ग्रामस्थ आणि सशस्त्र लोकांनी ओलीस ठेवले होते. वाटाघाटी होऊन सुटकेनंतर, नागरिकांना लिटन पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट घालून देण्यात आली.

बुधवारी २१ जणांना ओलीस ठेवल्यानंतर तंगखुल नागा बहुल उखरुल जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा दलांनी शोध मोहीम तातडीने सुरू केली. दरम्यान, तंगखुल नागांची सर्वोच्च संस्था असलेल्या तंगखुल नागा लाँग (कार्यकारी समिती) ने उखरुल जिल्ह्यातील कुकी बहुल शांगकाई गावात ताब्यात घेतलेल्या २० हून अधिक नागा नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याची मागणी करत दोन तासांचा अल्टिमेटम दिला होता.

मुख्यमंत्री युमनम खेमचंद सिंह यांनी उखरुल- इम्फाळ रस्त्यावर निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी जबाबदार असलेल्यांना मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांचे पालन करण्याचे आणि सर्व नागरिकांची सुरक्षित आणि बिनशर्त सुटका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना आणि जनतेला आश्वासन दिले की सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे आणि या भ्याड कृत्यात सहभागी असलेल्या दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.

हे ही वाचा:

इराकमध्ये पाच क्रू मेंबर्ससह अमेरिकन लष्करी विमान कोसळले!

एआयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अॅडोबचे सीईओ शांतनू नारायण पद सोडणार

पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम; अमेरिकेत गृहकर्जाचा दर ६.११% वर

मुंबईत एलपीजी टंचाईचा फटका पोलिसांना

दरम्यान, गुरुवारी कामजोंग जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या कुकी समुदायाच्या दोन सदस्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात तणाव आणखी वाढला. मृतांची ओळख पटली असून ते उखरुल जिल्ह्यातील शांगकाई गावातील रहिवासी ३५ वर्षीय थांगबोईमांग खोंगसाई आणि जवळच्या कामजोंग जिल्ह्यातील धवाई कुकी गावातील रहिवासी ४० वर्षीय थेंगिन बाईट अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी हे दोघेही डोंगराळ भागात पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी गेले होते परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. नंतर ग्रामस्थ आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध घेत असताना त्यांचे मृतदेह एकमेकांपासून काही अंतरावर आढळून आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version