नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर जवळपास ३०० भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी गुरुवारी (२७ ऑगस्ट) ही माहिती दिली. बेपत्ता भारतीयांमध्ये बहुतांश नागरिक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमार्गे प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रासुवा परिसरात आलेल्या या विनाशकारी महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या माहितीनुसार, सुमारे १६० जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खनाल यांनी सांगितले की, परदेशी नागरिकांसह सुमारे ५०० विदेशी नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या सुरक्षिततेबाबत नेपाळ सरकार विविध देशांच्या दूतावासांच्या संपर्कात आहे. भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भारतीय दूतावासाने नेपाळ सरकार आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून बचाव आणि मदतकार्याला गती दिली आहे. भारतीय नागरिकांना मदत मिळावी यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. या आपत्तीचा फटका रासुवा, धादिंग आणि नुवाकोटसह अनेक भागांना बसला आहे. रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. भोटेकोशी नदीच्या उपनदीचा प्रवाह हिमस्खलनामुळे अडवल्यानंतर अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने तिमुरे परिसराला सर्वाधिक फटका बसला.
हे ही वाचा:
ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी
सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती
हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या
नेपाळच्या महापुरामागे भूकंप नव्हे, हिमनदी कोसळल्याचा धक्का!
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळला १० टन मानवतावादी मदतीची पहिली खेप पाठवली आहे. भारताच्या या तातडीच्या मदतीबद्दल नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी आभार मानले आहेत. सध्या नेपाळमध्ये बेपत्ता नागरिकांचा शोध, बचावकार्य आणि तातडीच्या मदतीला प्राधान्य दिले जात आहे.
