मुंबई क्राइम ब्रँचच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) वांद्रे टर्मिनसजवळ १० कोटी रुपयांच्या चरस जप्तीप्रकरणातील मुख्य पुरवठादाराला बिहारमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.
माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी वरळी युनिटच्या पथकाने वांद्रे टर्मिनसजवळ एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून १० किलोहून अधिक चरस जप्त केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत १० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने चरसचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुख्य पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी वरळी युनिटचे पथक बिहारला रवाना करण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी पोलीस पथक बिहारमधील रक्सौल जिल्ह्यात पोहोचले. त्यानंतर बिहार पोलिसांच्या स्थानिक पथकाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी पूर्व चंपारण जिल्ह्यातून आरोपीला अटक केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईतील न्हावा शेवा बंदराजवळील कंटेनर फ्रेट स्टेशनच्या (सीएफएस) परिसरातून ५५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते. या अमली पदार्थाची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आयएसआयशी संबंधित तस्कर हुसेन दाद संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.
हे ही वाचा:
सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती
हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या
नेपाळच्या महापुरामागे भूकंप नव्हे, हिमनदी कोसळल्याचा धक्का!
‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी कमावले १०१ कोटी!
भारतातील अमली पदार्थांच्या बाजारपेठेत त्याचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीशीही त्याचे जुने संबंध असल्याची माहिती आहे. तो मूळचा अफगाणिस्तानातील कंदहारचा रहिवासी असून, सध्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)च्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सांगण्यात येते. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू आहे.
