घरदेश दुनियासात वर्षांनी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर?

सात वर्षांनी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर?

४०० जणांच्या शिष्टमंडळासह येण्याची शक्यता

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात येऊ शकतात. हा दौरा झाला तर २०१९ नंतर सात वर्षांनी शी जिनपिंग पहिल्यांदाच भारतात येतील. त्यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये नव्या संवादाची आणि तणाव कमी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शी जिनपिंग यांच्यासोबत तब्बल ४०० जणांचे मोठे शिष्टमंडळ भारतात येण्याची शक्यता आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे अधिकारी दिल्लीतील हॉटेल्स, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य प्रोटोकॉलची तयारी अंतिम टप्प्यात नेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, चीनचे अधिकारी भारत दौऱ्यासाठी हॉटेल आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतची तयारी पूर्ण करण्याच्या कामात व्यस्त आहेत. आणखी दोन भारतीय सूत्रांनीही शी जिनपिंग यांच्यासोबत सुमारे ४०० अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे शिष्टमंडळ भारतात आले, तर ते २०१९ च्या तुलनेत दुप्पट मोठे असेल. त्या वेळी शी जिनपिंग यांच्या शिष्टमंडळात २०० पेक्षा कमी अधिकारी होते.

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत. जून २०२० मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या संबंधांना मोठा धक्का बसला. या संघर्षात २० भारतीय आणि चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दीर्घकाळ तणाव कायम राहिला. ऑक्टोबर २०२४ मध्ये सैन्य मागे घेण्याबाबत झालेल्या करारानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळण्यास सुरुवात झाली. मात्र, सीमेवर शांतता आणि स्थैर्य हा भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी आजही महत्त्वाचा मुद्दा आहे.

शी जिनपिंग यांच्या संभाव्य भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील उच्चस्तरीय संवादालाही वेग आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बीजिंगमध्ये पोहोचले असून त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली आहे. सीमा विवादासह दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत शी जिनपिंग यांची भारतातील संभाव्य उपस्थिती दोन्ही देशांच्या नेतृत्वाला थेट संवादासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकते.

हे ही वाचा:

अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस

सोन्याला ‘सोन्याचा भाव’; चांदीची मात्र घसरण

“नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे”; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप

शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!

शी जिनपिंग भारतात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीबाबत किंवा तिच्या अजेंड्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सीमा विवाद, व्यापार, आर्थिक संबंध, सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version