भारतीय जनता पक्षाने देशातील नव्या पिढीतील तरुणांशी, म्हणजेच ‘जेन झी’शी थेट संवाद वाढवण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे. या टीममध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरातचे मंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समावेश आहे. तरुणांच्या अपेक्षा, समस्या आणि भविष्यातील संधी याबाबत त्यांचे मत जाणून घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठे आणि सरकारी शाळांमध्ये तरुणांशी थेट संवाद साधण्यावर भाजपाचा भर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तरुणांशी संपर्क वाढवण्याच्या सूचना दिल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे.
या मोहिमेत शिक्षण, रोजगार, करिअर, डिजिटल जग आणि भविष्यातील संधी यांसारख्या विषयांवर तरुणांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तरुणांना आपले प्रश्न थेट भाजपाच्या नेत्यांसमोर मांडता यावेत, यासाठी विविध संवाद कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांचा वर्ग भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे नव्या पिढीशी केवळ राजकीय भाषणांमधून नव्हे, तर थेट संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून जोडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
हे ही वाचा:
पीओकेत वार्तांकन करणारा पाक पत्रकार ठरला ‘दहशतवादी’
साखरेच्या दरात भडका; महिनाभरात २१ टक्क्यांची वाढ
निकृष्ट पोषण आहार उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन रद्द
अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्धाला नवे वळण
दरम्यान, भाजपाच्या नव्या राष्ट्रीय टीमची पहिली बैठकही शनिवारी झाली. या बैठकीत आगामी निवडणुका, पक्षाची संघटनात्मक तयारी आणि जनतेपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. नव्या राष्ट्रीय टीममध्ये ६५ पदाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यापैकी ५१ जण नवे चेहरे आहेत. एकूणच, ‘जेन झी’ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने आखलेली ही नवी रणनीती आगामी काळात महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. तरुणांची बदलती मानसिकता आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.
