मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) ऑटो-रिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या सुधारित भाड्याची अंमलबजावणी मंगळवार, १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. नव्या दरांनुसार रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची, तर टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार रिक्षाचं किमान भाडं २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आलं आहे. तर काळी-पिवळी टॅक्सीचं सुरुवातीचं भाडं ३१ रुपयांवरून ३३ रुपये झालं आहे. टॅक्सीसाठी हे किमान भाडं पहिल्या १.५ किलोमीटरसाठी लागू राहणार आहे.
भाडेवाढ संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि टॅक्सींसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र, नव्या भाड्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर तात्काळ अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेलं नाही. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मीटरचं कॅलिब्रेशन करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत चालकांनी प्रवाशांकडून सुधारित भाडे तक्त्यानुसार पैसे आकारायचे आहेत.
३० नोव्हेंबरपर्यंत मीटर अपडेट न करणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबरपासून कारवाई होऊ शकते. आरटीओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मीटर कॅलिब्रेशन न केलेल्या वाहनांवर दररोज ५० रुपयांचा दंड, कमाल ५ हजार रुपयांपर्यंत आकारला जाऊ शकतो.
हे ही वाचा:
टाइम्स स्क्वेअरमध्ये चाकू हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात आरोपी महिला ठार
मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
राहुल गांधी आता बोला…काँग्रेसच्या राज्यातले मौलवी म्हणाले, महिलांनी चार भिंतीत राहावे!
दीप्ती शर्माचा विक्रम; सर्वाधिक विकेट्सचा मान!
दरम्यान, मीटर कॅलिब्रेशनची प्रक्रिया मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशात सध्या सुमारे ५ लाख नोंदणीकृत रिक्षा आणि ४५ हजार काळी-पिवळी मीटर टॅक्सी आहेत. मात्र, मीटर तपासणी आणि कॅलिब्रेशनसाठी संपूर्ण परिसरात केवळ १५ ते २० केंद्रे उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चालकांना अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही एवढ्या मोठ्या संख्येने वाहनांचे मीटर अवघ्या तीन महिन्यांत अपडेट करणं आरटीओसमोर मोठं आव्हान ठरू शकतं, अशी चिंता व्यक्त केली आहे.
