घरविशेषपरळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!

परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!

शिखर समितीच्या बैठकीत झाला निर्णय

परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी आता २८६.६८ कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई येथे आज ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा हा १३३ कोटींचा होता. मात्र मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतिक्षालय अशी एकूण ९२ कामे करावयाची असून, या कामांची किंमत अनेक पटींनी आता वाढली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी बीड यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेस्तव सादर केला होता.

अनेक शतकापूर्वी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, मेरू पर्वत, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त

‘भारताला दहशतवादाची सखोल समज’

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर

भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

जुन्या मंदिरांना रंग न देता त्यांना दगडासारखा रंग द्यावा, मंदिराची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मंदिर समितीसह परळी नगर परिषदेने घ्यावी, तसेच ठिकठिकाणी दाट सावली देणारी झाडे लावावीत शिवाय पाय घसरणार नाहीत अशा फरश्यांचा वापर पायऱ्यांमध्ये करावा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्या.तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि परिसरात पर्यटनवाढीसाठी देखील प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव मनोज शौनिक,आदी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version