घरविशेषरस्ता नाही, पूल नाही... उपचाराअभावी २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

रस्ता नाही, पूल नाही… उपचाराअभावी २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

नंदुरबारच्या दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेचे वास्तव समोर

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेची विदारक स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. वेहगी येथील बारीपाडा गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने २३ वर्षीय विवाहितेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. बांबू आणि चादरीच्या साहाय्याने तयार केलेल्या झोळीतून तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र रुग्णालय गाठण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

रुसाबाई सुभाष वळवी यांना शुक्रवारी सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. मात्र बारीपाडा गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने तसेच सुक नदीवरील उपनदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिकेलाही गावापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यातच परिसरात मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यातही ग्रामस्थांना अडचणी आल्या.
हे ही वाचा:
राहुल गांधींकडून द्वेष, पण काँग्रेस मुख्यमंत्री शिवकुमार यांना अदानी हवेहवेसे

महामेट्रोने म्हटले काँग्रेसचे आरोप महाखोटे !

…हा तर राहुल गांधींना पुन्हा लाँच करण्याचा प्रयत्न!

साखर महागली, चहादेखील ‘उकळणार’

परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या साहाय्याने झोळी तयार केली. त्यात रुसाबाईंना ठेवून पिंपळखुंटा येथील रुग्णालयाच्या दिशेने पायपीट सुरू करण्यात आली. मात्र नदी, दुर्गम वाटा आणि वाहतुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी मौल्यवान वेळ निघून गेला. अखेर उपचार मिळण्यापूर्वीच रुसाबाईंची प्राणज्योत मालवली.

रुसाबाई यांचे माहेर वेहगी बारीपाडा येथे असून सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती असून, त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटली, विकासाच्या घोषणा झाल्या; मात्र नंदुरबारसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आजही रस्ता, पूल, मोबाइल नेटवर्क आणि तत्काळ आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. एका तरुण महिलेचा उपचाराअभावी गेलेला जीव हा केवळ एका कुटुंबाचा शोक नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version