ऑपरेशन सिंदूरच्या नियोजनाबाबत माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करी कारवाईसाठी ‘पूर्ण स्वातंत्र्य’ दिले होते. मात्र, कारवाई घाईघाईने न करता योग्य वेळी करावी, तसेच कारवाईत मानवी किंवा तांत्रिक कारणांमुळे अपयश येणार नाही याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधानांनी दिल्याचे चौहान यांनी सांगितले.
विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या ‘विमर्श’ कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकांची माहिती दिली. २३ ते २९ एप्रिल २०२५ दरम्यान भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराबाबत सरकार आणि लष्करी नेतृत्वाच्या अनेक बैठका झाल्या. २३ एप्रिलला राजनैतिक, व्यापार आणि आर्थिक उपाययोजनांवर चर्चा झाली, तर २९ एप्रिलला लष्करी कारवाईच्या पर्यायावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख उपस्थित होते.
चौहान यांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानविरोधात कठोर प्रत्युत्तर देण्याचा राजकीय निर्णय स्पष्ट होता. मात्र, कारवाई नेमकी कधी करायची, याचा निर्णय लष्करावर सोपवण्यात आला होता. पंतप्रधानांनी तातडीने कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय दबाव नसल्याचे सांगितले आणि योग्य वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.
ऑपरेशन सिंदूरच्या तयारीदरम्यान पंतप्रधानांनी लष्कराला दिलेल्या निर्देशांमध्ये कारवाईच्या यशाची खात्री आणि पुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. कारवाई मानवी किंवा तांत्रिक कारणांमुळे अपयशी ठरू नये आणि करण्यात आलेल्या कारवाईचे पुरावे भारताकडे असावेत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर लष्कराला ‘पूर्ण स्वातंत्र्य’ देण्यात आले, असे चौहान यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ला? माजी सीडीएस काय म्हणाले?
इराणसोबतच्या तेल व्यापाराप्रकरणी चार भारतीय कंपन्यांसह तीन व्यक्तींवर निर्बंध
तळोज्यात ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; १५ जणांवर गुन्हा
अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर आणि परिस्थितीच्या आकलनातील त्रुटींवरही चौहान यांनी भाष्य केले. विशेषतः सागरी क्षेत्रातील भारतीय नौदलाच्या हालचालींबाबत पाकिस्तानकडे चुकीची माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानी लष्कराच्या ब्रीफिंगमध्ये भारतीय कॅरिअर बॅटल ग्रुपच्या हालचालींबाबत काही दावे करण्यात आले होते. मात्र, भारतीय वेस्टर्न नेव्हल कमांडकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाची तुकडी पाकिस्तानने सांगितलेल्या ठिकाणापासून १०० ते ३०० नॉटिकल मैल दूर होती, असे चौहान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या सागरी विमानांनीही या काळात उड्डाण केले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
