इंधनातील इथेनॉल मिश्रणाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील खर्चावर दिसू लागला आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या मक्याचा पुरवठा कमी झाला असून, पशुखाद्याचा खर्च वाढला आहे. याचाच थेट परिणाम अंड्यांच्या किमतीवर झाला असून, गेल्या वर्षभरात देशभरात अंड्यांचे दर तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या माहितीनुसार, सध्या फार्मगेट पातळीवर एका अंड्याची किंमत सुमारे ७ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर किरकोळ बाजारात अंडे ८.५० ते ९ रुपयांना विकले जात आहे. येत्या हिवाळ्यात अंड्यांची मागणी नेहमीप्रमाणे वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
विदेशी बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा दबदबा
कृति सॅननची वादग्रस्त जाहिरात हटवली!
मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार
ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींचे सैन्याला लष्करी कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य!
अंड्यांच्या दरवाढीमागे नेमके काय घडत आहे, हे समजून घेण्यासाठी मक्याच्या बाजाराकडे पाहणे महत्त्वाचे आहे. पोल्ट्री खाद्याच्या उत्पादनात मका हा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. पोल्ट्री उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी तब्बल ६५ ते ७० टक्के हिस्सा खाद्याचा असतो. त्यात मक्याची भूमिका मोठी आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढल्याने त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुमारे १४ हजार रुपये प्रतिटन असलेला मका आता जवळपास २६ हजार ५०० रुपये प्रतिटनावर पोहोचला आहे. गेल्या पाच महिन्यांतच मक्याच्या दरात जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारतामध्ये एकूण मक्याचे उत्पादन सुमारे ४ कोटी ३४ लाख टन असून, त्यापैकी जवळपास १ कोटी ७० लाख टन मका सध्या इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात असल्याचे उद्योगातील आकडेवारीतून समोर आले आहे. म्हणजेच इंधन आणि पशुखाद्य उद्योग एकाच पिकासाठी थेट स्पर्धा करत आहेत. देशातील मक्याच्या वापरामध्ये पोल्ट्री उद्योगाचा वाटाही सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे मक्याच्या उपलब्धतेतील कोणताही बदल पोल्ट्री उत्पादन खर्चावर झपाट्याने परिणाम करतो.
मका-आधारित इथेनॉल निर्मितीतही गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे. २०२२ मध्ये सुमारे १० लाख टन असलेले उत्पादन आता जवळपास १ कोटी ७० लाख टनांवर पोहोचले आहे. पुढील काही वर्षांत ते २ कोटी ५० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्यावरील मागणीचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, अंड्यांच्या दरवाढीसाठी केवळ इथेनॉलला जबाबदार धरता येणार नाही. उष्णतेचा ताण, कोंबड्यांचा मृत्यूदर, हवामानातील बदल आणि सोयाबीनसह इतर खाद्यघटकांच्या किमती यांचाही पोल्ट्री उत्पादनावर परिणाम होतो. तरीही मक्याच्या वाढत्या मागणीमुळे खाद्यखर्चात झालेली वाढ हा सध्याच्या दरवाढीतील महत्त्वाचा घटक ठरत आहे.
एकेकाळी भारतातून बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांना मका निर्यात केला जात होता. मात्र, देशांतर्गत पोल्ट्री आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी यामुळे निर्यातीसाठी उपलब्ध अतिरिक्त मका कमी झाला आहे. त्यामुळे इथेनॉलमधून ऊर्जा सुरक्षेला चालना मिळत असली, तरी त्याचा परिणाम अन्न आणि पशुखाद्याच्या किमतीवर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
थोडक्यात, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याच्या धोरणाचा फायदा इंधन क्षेत्राला होत असताना त्याची किंमत आता अप्रत्यक्षपणे ग्राहकांना मोजावी लागत आहे. कारण इथेनॉलसाठी मका, मक्यासाठी वाढती स्पर्धा, वाढलेला पशुखाद्य खर्च आणि त्यातून वाढलेले अंड्यांचे दर—ही संपूर्ण साखळी थेट ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचली आहे.
