एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक मोबाइल कनेक्शन असतील, तर आता सावध होण्याची गरज आहे. दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्डच्या निर्धारित मर्यादेची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ ऑगस्ट २०२६ पासून एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच निर्धारित मर्यादेइतके मोबाइल कनेक्शन असतील, तर त्याला नवीन सिम कार्ड देण्यास टेलिकॉम कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे.
सध्या देशातील बहुतांश भागांसाठी एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ मोबाइल कनेक्शन ठेवण्याची मर्यादा आहे. ही मर्यादा सर्व टेलिकॉम ऑपरेटर आणि वेगवेगळ्या सर्कलमधील कनेक्शन मिळून लागू होते. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ कनेक्शनची आहे.
DoT ने १७ ऑगस्टला जारी केलेल्या निर्देशांनुसार, २४ ऑगस्टपासून नवीन सिम मागणाऱ्या ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाइल कनेक्शन आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. मर्यादा पूर्ण झाल्यास नवीन कनेक्शन देता येणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांकडून सिम घेतल्यासही ही मर्यादा चुकवता येणार नाही.
हे ही वाचा:
“भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक”
कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…
दुःखात ‘देवाभाऊ’ बनले आधार, आज बहिणीच्या नव्या संसाराची बांधली गाठ
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा
या प्रक्रियेसाठी Digital Intelligence Platform (DIP) चा वापर केला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध टेलिकॉम कंपन्यांमधील कनेक्शनची एकत्रित माहिती तपासता येईल. तसेच, २३ ऑगस्टपासून मर्यादा गाठलेल्या ग्राहकांचा प्रतिनिधी फोटोही DIP वर उपलब्ध करून दिला जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त कनेक्शन सक्रिय झाल्यास अतिरिक्त नंबर तात्पुरते निलंबित केले जाऊ शकतात. सायबर फसवणूक, बनावट ओळख आणि मोबाइल कनेक्शनच्या गैरवापराला आळा घालणे हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश आहे.
