घरविशेषलाडकी बहीण योजनेचे फॉर्म 'मविआ' कार्यकर्त्यांकडे देऊ नका

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे देऊ नका

सरकारी यंत्रणेकडेच द्या, रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन

लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या १८ आणि १९ जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रितरित्या लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ योग्यवेळी घेतील, असेही रावसाहेब पाटील दानवे यांनी नमूद केले.

हेही वाचा..

राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्यापक धोरणाची अंमलबजावणी करा

भाजपचे उद्या पुण्यात महाअधिवेशन

मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !

पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले

महायुतीत एकसंधपणा असताना महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे अशी टीका दानवे यांनी केली. मविआ तील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते तर भावी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत असून आघाडीतील बिघाडी चे दर्शन आत्तापासूनच जनतेला घडत आहे. आघाडीतील ही बिघाडी काही आत्ताची नव्हे तर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये झालेला वादंग लोकसभेवेळी दिसला आहेच असेही श्री. दानवे म्हणाले. मविआ मध्ये आलबेल नसताना त्यांच्यावर मतदारांनी विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

महायुती सरकार जनहितासाठी झटून काम करत असून विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांची वीजबिल माफी, लाडकी बहीण, भावांतराप्रमाणे शेतक-यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे हे आणि असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले असे श्री. दानवे यांनी नमूद केले. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर चहुबाजूंनी टीका करत असलेले मविआ चे नेते मात्र त्या त्या मतदारसंघात फलकबाजी करून महायुती सरकारच्या योजनांचे श्रेय लाटण्याचा हीन प्रयत्न करत असल्याची प्रखर टीका श्री. दानवे यांनी केली. अशी दुटप्पी भूमिका असलेल्या मविआच्या घटकपक्षांपासून सावध रहा आणि सरकारी यंत्रणेतूनच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा असे आवाहन त्यांनी केले.

भाजपाच्या पुण्यात रविवारी होणा-या अधिवेशनाला पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्याचा निर्धार कार्यकर्ते या अधिवेशनात करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version