घरक्राईमनामापाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाने दोन कॉलेज विद्यार्थिनींना बसला शॉक

पाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाने दोन कॉलेज विद्यार्थिनींना बसला शॉक

नागरिकांच्या तत्परतेने विद्यार्थिनींचे प्राण वाचले, चौकशीचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नेरुळमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यावर विद्युत प्रवाह उतरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनींना जोरदार विजेचा शॉक बसला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे दोन्ही विद्यार्थिनींचे प्राण वाचले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना नेरुळमधील एलपी स्टॉपजवळील उड्डाणपूल परिसरात, बिकानेर दुकानासमोरील रस्त्यावर घडली. मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे विद्युत प्रवाह थेट साचलेल्या पाण्यात उतरला. त्याचवेळी दोन कॉलेज विद्यार्थिनी त्या मार्गाने जात होत्या. पाण्यातून चालत असताना अचानक त्यांना विजेचा तीव्र शॉक बसला आणि त्या जागीच रस्त्यावर कोसळल्या.
हे ही वाचा:
पॉन्झी स्कीम्सवर लक्ष ठेवणाऱ्या इंटेलिजन्स युनिट्सचे काय झाले?

सेन्सेक्समध्ये ४४४ अंकांची दमदार उसळी; निफ्टी पुन्हा २४ हजारांच्या पार

विम्बल्डनमध्ये सेरेनाच्या पुनरागमनाला धक्का

भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याविषयी फारुख अब्दुल्ला, मेहबूबा यांना चिंता

हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी अत्यंत सावधगिरीने दोन्ही विद्यार्थिनींना पाण्यापासून दूर नेले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या दोघींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

या घटनेनंतर प्रशासनाचीही तातडीने हालचाल सुरू झाली. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरात कुठेही पाणी साचणार नाही तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. मात्र, काही ठिकाणी यंत्रणेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे अजूनही पाणी साचत असल्याची कबुली त्यांनी दिली.

दोन्ही विद्यार्थिनींना विजेचा शॉक लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. नेमका निष्काळजीपणा कुणाचा होता, विद्युत यंत्रणेमध्ये कोणती त्रुटी राहिली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, याचा तपास संबंधित विभागांकडून केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उघड्या विद्युत तारा, शॉर्टसर्किट किंवा विद्युत उपकरणांमधील बिघाडामुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरू शकतो. त्यामुळे पाणी साचलेल्या भागातून जाणे शक्यतो टाळावे आणि संशयास्पद परिस्थिती आढळल्यास तातडीने महापालिका किंवा वीज वितरण यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version