केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात रविवारी विवाहसोहळ्यांचा नवा विक्रम नोंदवला गेला. मल्याळम महिन्याच्या चिंगममधील पहिला रविवार विवाहासाठी शुभ मानला जात असल्याने मंदिरात मोठी गर्दी झाली होती. या दिवशी अवघ्या सात तासांच्या कालावधीत तब्बल ४१६ जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला. मंदिराच्या इतिहासातील एका दिवसातील हा सर्वाधिक विवाहांचा आकडा ठरला आहे.
विवाह सोहळ्यांना पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी सुरुवात झाली आणि दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ते सुरू होते. दरम्यान, उषापूजा आणि पंथीराडी पूजेसाठी मंदिर काही काळ बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळील पहिल्या मंडपात देवस्वम मंडळाचे अध्यक्ष ए. व्ही. गोपीनाथ यांनी पारंपरिक दीपप्रज्वलन केल्यानंतर विवाहांना सुरुवात झाली. त्यानंतर मंदिर परिसरातील इतर मंडपांमध्येही विवाहसोहळे सुरू करण्यात आले.
हे ही वाचा:
राहुल गांधींनी आता महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा द्यावा!
एसबीआयची झेप २०० लाख कोटींकडे! २०३० पर्यंत व्यवसाय दुप्पट करण्याची क्षमता
न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या पंजाबच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
गणेशमूर्ती पडून झालेल्या अपघातातील मृत गणेशसेवकांच्या नातेवाईकांना ५ लाख
या विशेष दिवसासाठी मंदिराच्या प्रांगणात सहा विवाह मंडप उभारण्यात आले होते. प्रत्येक विवाहासाठी टोकन व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वधू-वरांसोबत येणाऱ्या व्यक्तींची संख्या २४ पर्यंत मर्यादित करण्यात आली होती. सहाही मंडपांमध्ये दर तासाला ६० हून अधिक विवाह पार पडत होते. पहिल्या दोन तासांतच तब्बल १३७ विवाह झाल्याची माहिती देवस्वम प्रशासनाने दिली.
गुरुवायूर मंदिरातील यापूर्वीचा एका दिवसातील विवाहांचा विक्रम ८ सप्टेंबर २०२४ रोजी नोंदवला गेला होता. त्या दिवशी ३३४ विवाह झाले होते. यंदा हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत निघाला. या दिवशी स्पॉट बुकिंगसह एकूण ४४२ विवाह नियोजित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ४१६ विवाह पार पडले.
इतक्या मोठ्या संख्येने विवाह होणार असल्याने मंदिर प्रशासनाने सुरक्षेची आणि गर्दी व्यवस्थापनाची विशेष तयारी केली होती. शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले होते, तर अग्निशमन व बचाव पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. मंदिर प्रशासनाने नियमित दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर काही निर्बंध घातले होते. या व्यवस्थेला स्थानिक नागरिक आणि भाविकांनी मोठे सहकार्य केल्याचे देवस्वम मंडळाने सांगितले.
विवाहासाठीची साधी आणि पारंपरिक पद्धत तसेच गुरुवायूरप्पनच्या आशीर्वादासाठी असलेली श्रद्धा यामुळे गुरुवायूर मंदिराला केरळमध्ये विवाहस्थळ म्हणून विशेष महत्त्व आहे. याच श्रद्धेचा प्रत्यय रविवारी पुन्हा आला. अवघ्या काही तासांत शेकडो जोडपी विवाहबंधनात अडकली आणि गुरुवायूर मंदिराच्या इतिहासात ४१६ विवाहांचा नवा विक्रम नोंदवला गेला.
