जम्मू-काश्मीरमधील १९९८ च्या वंधामा हत्याकांडाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या हत्याकांडात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लक्ष्यित हत्यांच्या प्रकरणांचा तपास पुन्हा हाती घेण्याच्या व्यापक मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर राज्य तपास यंत्रणेने (SIA) ही कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणासोबतच काश्मिरी पंडित नेते टिका लाल टपलू यांच्या हत्या प्रकरणाचा तपासही वेगाने सुरू करण्यात आला आहे. तसेच न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्या हत्येच्या प्रकरणातही तपासाला चालना देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयएने काश्मिरी पंडित परिचारिका सरला भट, तसेच लेखक सर्वानंद कौल प्रेमी आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र कौल यांच्या हत्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू केला होता.
२५ जानेवारी १९९८ रोजी गांदरबल जिल्ह्यातील वंधामा गावात सशस्त्र दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या घरांमध्ये घुसून २३ जणांची हत्या केली होती. मृतांमध्ये नऊ महिला आणि चार मुलांचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आणि रमजानमधील शब-ए-कद्रच्या रात्री ही घटना घडली होती. या हत्याकांडाचा तपास अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता एसआयएने हे प्रकरण पुन्हा उघडल्याने या हत्यांमागील दहशतवादी आणि त्यांच्या कथित मदतनीसांची ओळख पटवण्यावर तपास यंत्रणेचा भर आहे.
वंधामा हत्याकांड आणि टिका लाल टपलू यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर एसआयएने काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. तपास पथकाकडून या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या कथित ‘ओव्हरग्राउंड वर्कर्स’ची भूमिका तपासली जात आहे.
हे ही वाचा:
बलुचिस्तानात पाक सैन्यावर हल्ला; १३ ठार
इम्रान खान यांच्यासाठी २१ माजी कर्णधार एकवटले
माझगावमध्ये गणपती आगमनावेळी अंडी फेकल्याने वाद
सोने १.६३ लाखांच्या पार, चांदीला नफा वसुलीचा मार
जुन्या प्रकरणांच्या तपासाला वेग देताना एसआयएने जूनमध्ये १९९० मध्ये काश्मिरी पंडित परिचारिका सरला भट यांच्या हत्येप्रकरणी ७३७ पानी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात तुरुंगात असलेला JKLF प्रमुख यासिन मलिक याला कथित सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये सर्वानंद कौल प्रेमी आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र कौल यांच्या हत्या प्रकरणातही जम्मू-काश्मीरमधील नऊ ठिकाणी झडती घेण्यात आली होती.
