घरराजकारणरामगिरी महाराज, नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न, मुस्लीम आरक्षण आणि बरच काही...

रामगिरी महाराज, नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न, मुस्लीम आरक्षण आणि बरच काही…

ऑल इंडिया उलेमा बोर्डाचं महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार असून २३ तारखेला कोणी बाजी मारली याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ने महाविकास आघाडीला पत्र लिहून सरकार स्थापनेला पाठिंबा दिला आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्ड महाविकास आघाडीमधील उमेदवारांना प्रोत्साहन देईल परंतु, त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पत्र लिहून पाठींबा हवा असल्यास १७ अटी मान्य करण्यास सांगितले आहे. त्या अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उलेमा बोर्ड महाविकास आघाडीला निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. दरम्यान, उलेमा बोर्डाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या ठेवल्या आहेत. महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं तर त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करावा, त्याशिवाय आरएसएसवर बंदी आणावी अशा काही मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आश्वासन पत्र द्यावे, असे ऑल इंडिया उलेमा बोर्डाने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, उलामा बोर्डाच्या १७ मागण्यांच्या पत्रानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उलामा बोर्डाला पत्र पाठवून त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पावले उचलू, असे आश्वासन दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याकडे लक्ष आहे.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीसमोर ठेवलेल्या अटी:

  • वक्फ विधेयकाला विरोध
  • नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के मुस्लिम आरक्षण असावे
  • महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील मशिदी, कब्रस्तान, दर्ग्याच्या जप्त केलेल्या जमिनींचे आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत
  • महाराष्ट्राच्या वक्फ बोर्डाच्या विकासासाठी १००० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा
  • २०१२ ते २०२४ पर्यंत दंगल पसरवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका करण्याची मागणी
  • मौलाना सलमान अझहरीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे.
  • महाराष्ट्रातील मशिदींच्या इमाम आणि मौलाना यांना दरमहा १५ हजार रुपये देण्याचे सरकारचे आश्वासन
  • पोलीस भरतीतही मुस्लिम तरुणांना प्राधान्य द्यावे
  • महाराष्ट्रातील सुशिक्षित मुस्लिम समाजाला पोलीस भरतीत प्राधान्य द्यावे
  • रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना तुरुंगात टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने आंदोलन करावे.
  • महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्यानंतर ऑल इंडिया उलामा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, अलीम हाफिज मशिदीचे इमाम यांना शासकीय कमिटीवर घेण्यात यावे.
  • महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील ५० उमेदवारांना तिकीट देण्यात यावे
  • महाराष्ट्र सरकारने राज्य वक्फ बोर्डात ५०० कर्मचाऱ्यांची भरती करावी
  • महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत कायदा करावा
  • आमचे प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांवर कायदेशीर बंधने घालण्यासाठी कायदा करण्यात यावा
  • जेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात येईल तेव्हा राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर बंदी घातली पाहिजे
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ प्रचारासाठी जिल्ह्यांतील अखिल भारतीय उलेमा बोर्डाला आवश्यक यंत्रणा पुरविण्यात यावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version