काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मकथेच्या प्रकाशनावरून वाद निर्माण झाला आहे. ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मकथेचं भारतातील प्रकाशन करण्यापासून पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने माघार घेतली आहे. पुस्तकाच्या काही भागांमध्ये संपादकीय बदल आणि काही मजकूर वगळण्याची सूचना प्रकाशकाकडून करण्यात आली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी या बदलांना आणि वगळण्याच्या सूचनांना नकार दिल्याचं वृत्त आहे. त्यानंतर प्रकाशनाचा करार पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
माहितीनुसार, पेंग्विन इंडियाने आत्मकथेच्या काही भागांमध्ये संपादकीय बदल आणि काही मजकूर वगळण्याची मागणी केली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी आपल्या लिखाणात कोणतेही बदल किंवा वगळणं करण्यास नकार दिला. या मतभेदानंतर पेंग्विन इंडियाने पुस्तकाच्या भारतातील प्रकाशन प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने नंतर या प्रकरणावर स्पष्टीकरण देत आपण या आत्मकथेचे प्रकाशक नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत आणि संपादकीय प्रक्रियेबाबत विविध वृत्तांमध्ये वेगवेगळे दावे समोर येत आहेत.
पेंग्विन इंडियाने माघार घेतल्यानंतर भारतात या आत्मकथेचं प्रकाशन करण्यासाठी इतर प्रकाशकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. हार्परकॉलिन्स इंडिया हे पुस्तक प्रकाशित आणि वितरित करण्यासाठी कराराच्या अंतिम टप्प्यात असल्याचं वृत्त आहे. मात्र, याबाबत अंतिम अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
हे ही वाचा:
मोदींसोबत छोट्या विद्यार्थिनींचा रक्षाबंधनाचा उत्साह
पंतप्रधानांसह मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी
प्रज्ञानंदन ठरला ग्रँड चेस टूर फायनल जिंकणारा पहिला भारतीय
तिबेटमध्ये नेपाळ सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; पुन्हा महापुराचा धोका
सोनिया गांधींची ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ ही आत्मकथा १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे. अमेरिकेतील अल्फ्रेड ए. नॉफ या प्रकाशन संस्थेकडून पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. हे पुस्तक सुमारे ५४४ पानांचं असून, सोनिया गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या राजकीय प्रवासावरही प्रकाश टाकणार आहे. या आत्मकथेत सोनिया गांधी यांनी इटलीतील एका छोट्या गावातील बालपणापासून भारतातील राजकीय प्रवासापर्यंतची कहाणी मांडली आहे. राजीव गांधींसोबतचं त्यांचं वैवाहिक जीवन, नेहरू-गांधी कुटुंबात प्रवेश, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या निधनानंतरचे अनुभव आणि त्यानंतर भारतीय राजकारणात आलेली त्यांची भूमिका याबाबत पुस्तकात वैयक्तिक अनुभव मांडले जाणार आहेत.
