घरराजकारण“अतुल भातखळकर विजयी झाले तर वक्फ बोर्डाच्या असंवैधानिक मागण्या अमान्य होतील”

“अतुल भातखळकर विजयी झाले तर वक्फ बोर्डाच्या असंवैधानिक मागण्या अमान्य होतील”

खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आला असून कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित रथयात्रेत भोजपुरीचे सुपरस्टार, गायक आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, जाहीर सभेत बोलताना तिवारी म्हणाले की, ही निवडणूक अशासाठी झाली पाहिजे की, अतुल भातखळकर जर विजयी झाले तर वक्फ बोर्डाची असंवैधानिक मागणी अमान्य होईल.

आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला खासदार मनोज तिवारी यांनी संबोधित करताना म्हटले की, “मी पाच वर्षांपूर्वी तुमच्याकडून अतुल भातखळकर यांच्यासाठी मतांचे दान मागायला आलो होतो. त्याचप्रमाणे पुन्हा तुम्ही भाजपा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी मागणी करायला आलो आहे. पण यावेळी आपल्याला त्यांना फक्त आमदार बनवायचं नाही, यावेळी त्यांना मंत्री बनवायचं आहे.”

खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. या देशात काँग्रेसचे मोठे पंतप्रधान म्हणायचे, ते जेव्हा १०० रुपये वरून पाठवतात तेव्हा मात्र १५ रुपये तुमच्यापर्यंत पोहोचतात पण आता नरेंद्र मोदी म्हणतात, देश हाच आहे, लोक हेच आहेत, अधिकारी हेच आहेत, पण आज तुम्ही ५०० रुपये जरी लाडक्या बहिणीला पाठवले तरी ते थेट तसेच बँकेत जमा होतात एकही रुपया इथला तिथे होत नाही.

“काँग्रेसने वक्फ बोर्डाला कायद्यात तरतुदी करून असे अधिकार दिले की, उद्या वक्फ बोर्डाने तुमच्या घरावर दावा केला तरी तुम्ही त्या विरोधात काही करू शकणार नाहीत. ज्या लोकांनी वक्फ बोर्डाला असे अधिकार दिले त्यांचे निवडणुकीत खातंही उघडता कामा नये. त्यामुळे ही निवडणूक यासाठी झाली पाहिजे की, अतुल भातखळकर विजयी झाले तर वक्त बोर्डाच्या असंवैधानिक मागण्या निरस्त होतील. कारण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत कोणाच्याही असंवैधानिक हट्ट पुरवले जाणार नाहीत. आमचा मंत्रच ‘सबका साथ सबका विकास’ आहे,” असं मनोज तिवारी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मनोज तिवारी म्हणाले की, “आमच्या सोबत निवडणूक लढवली, बहुमत घेतलं, पण निकाल लागल्यावर त्यांच्याकडे गेले, सत्ता स्थापन केली, त्याची परिणीती काय आली तर पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला पालघर साधूंच्या हत्याकांडाला उत्तर द्यायचं आहे.” मी येण्याच्या आधी अतुल भातखळकर एक लाख मतांच्या मताधिक्क्याने विजयी होणार होते आता मी त्यांच्यासाठी मतं मागायला आलो आहे तर त्यात २५ हजार मतांची भर पडलीच पाहिजे. यावेळी त्यांचा सव्वा लाख मतांनी विजय होईल हे नक्की कारण महाविकास आघाडीच्या गतीविधींना बघता त्यांना एक मत पडावं एवढीही त्यांची पात्रता नाही, असंही मनोज तिवारी म्हणाले.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू

मुंबईत बांगलादेशी, रोहिंग्या वाढतील, २०५१ पर्यंत हिंदू राहतील ५४ टक्के

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

दरम्यान, महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनीही जाहीर सभेत मतदारांना विश्वास दिला की ते कांदिवली पूर्वेच्या मतदारांना तक्रारीची संधी देणार नाहीत. “मी १० वर्षांपासून आमदार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढची पाच वर्षसुद्धा मी आमदार असणार आहे अशावेळी मी तुम्हाला विश्वास देतो की मागच्या दहा वर्षांत ज्याप्रमाणे झपाट्याने मी कामं केली त्याच झपाट्याने पुढची पाच वर्ष कामं करेन,” असं अतुल भातखळकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version