नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा ४६९ वर पोहोचला असून, १,४६८ जण अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये २९० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, पुराचा धोका अद्याप टळलेला नसून भोटे कोशी नदीच्या उगमाजवळ तयार झालेल्या नव्या बॅरिअर लेकमुळे आणखी एका महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदी कोसळल्यानंतर बर्फ आणि खडकांचा मोठा ढिगारा नदीत कोसळला. त्यामुळे अचानक पाण्याचा प्रचंड प्रवाह निर्माण झाला. पाणी, चिखल, दगड आणि मातीच्या लोंढ्याने नेपाळमधील रासुवा, नुवाकोट यांसह अनेक भागांना मोठा फटका बसला. अनेक घरं, बाजारपेठा, रस्ते आणि पूल वाहून गेले असून, काही भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
या आपत्तीनंतर २९० भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यात जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच विविध राज्यांतील पर्यटक आणि कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा समावेश आहे. भारत सरकारकडून या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळ सरकार, स्थानिक प्रशासन, राज्य सरकारे आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
भारताने आतापर्यंत ८४ भारतीय नागरिकांची सुटका केली आहे. यामध्ये त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पातील ६३ कामगार आणि तामिळनाडूतील २१ नागरिकांचा समावेश आहे. तसेच रासुवा येथे अडकलेल्या २७ परदेशी पर्यटकांची सुटका करण्यात आली असून, त्यात ११ भारतीय नागरिक आहेत.
नेपाळमधील बचाव आणि मदतकार्याला भारतानेही वेग दिला आहे. भारताने आतापर्यंत ४७.५ टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य नेपाळला पाठवलं आहे. यामध्ये तात्पुरते निवारे, ब्लँकेट्स, औषधं, स्वच्छता साहित्य, सोलर दिवे आणि अन्नपॅकेट्सचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी संवाद साधून भारताच्या पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.
हे ही वाचा:
नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची तिकीट विक्रीत धूम
सेहवाग-द्रविड़ यांच्या मुलांची भारताच्या अंडर-१९ संघात निवड
S-400चा शोध घेण्यासाठी पाकने सक्रीय केलेले गुप्तहेर-स्लीपर सेल
नव्या बॅरिअर लेकमुळे पुन्हा महापुराचा धोका
एकीकडे बचावकार्य सुरू असतानाच आता नव्या बॅरिअर लेकमुळे दुसऱ्या महापुराचा धोका निर्माण झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या तलावात आतापर्यंत सुमारे २० लाख घनमीटर पाणी साचलं असून, पुढील तीन दिवसांत आणखी ३० लाख घनमीटर पाणी जमा होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक अडथळा तुटल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा भोटे कोशी आणि त्रिशुली नदीच्या प्रवाहात येऊ शकतो.
