भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत एकामागून एक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. भारतीय हवाई दलाच्या पश्चिम वायू कमांडचे तत्कालीन प्रमुख एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त) यांनी केलेल्या दाव्यानुसार, ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारतातील S-400 हवाई संरक्षण यंत्रणांची ठिकाणं शोधण्यासाठी गुप्तहेर आणि स्लीपर सेल सक्रिय केले होते. S-400 ही यंत्रणा पाकिस्तानच्या हवाई कारवायांसाठी सर्वात मोठा धोका ठरली होती, असं मिश्रा यांनी सांगितलं.
मिश्रा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, पाकिस्तानला भारतातील S-400 यंत्रणा नेमक्या कुठे तैनात आहेत, याचा शोध घ्यायचा होता. यासाठी पाकिस्तानने उपलब्ध असलेले विविध मार्ग वापरले. इतर देशांकडून उपग्रहाच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. मात्र, या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान S-400च्या क्षमतेमुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांना भारतीय सीमेपासून २०० किलोमीटरच्या आत येणंही कठीण झालं, असा दावा एअर मार्शल मिश्रा यांनी केला. त्यांच्या मते, S-400 हे पाकिस्तानच्या हवाई कारवायांसाठी सर्वात मोठं आव्हान बनलं होतं.
S-400 ही रशियन बनावटीची जमिनीवरून हवेत मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अत्याधुनिक रडार आणि इंटरसेप्शन क्षमतेमुळे ही यंत्रणा दूरवरून येणाऱ्या हवाई धोक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करू शकते. भारताने २०१८ मध्ये रशियासोबत पाच S-400 प्रणालींसाठी करार केला होता. यापैकी तीन प्रणाली भारतीय हवाई दलात दाखल झाल्या असून, चौथी प्रणाली जून २०२६ मध्ये मिळाल्याची बातमी आहे.
हे ही वाचा:
हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!
नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता
ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी
सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती
पाकिस्तानने भारतातील S-400ची ठिकाणं शोधण्यासाठी गुप्तहेर आणि स्लीपर सेल सक्रिय केल्याचा दावा मिश्रा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, S-400मुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे या यंत्रणेचा ठावठिकाणा मिळवण्याला पाकिस्तानने प्राधान्य दिलं.
