घरराजकारणकॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहिलं असून त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याकडेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या सुमारे १२ राज्यांमध्ये प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं फडणवीसांनी पत्रात नमूद केलं आहे.

हे ही वाचा:

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

‘या’ माजी आमदाराला अटक

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

या कोरोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version