घरराजकारणमहाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवायला ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळेच अखेर सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात सातत्याने होत असलेला कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट पाहता राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. पण सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांचा कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या मानाने राज्यातील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या साऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी पार पडली. या बैठकीत राज्यातील एकूणच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असा सूर सगळ्याच मंत्र्यांचा दिसून आला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन एकूण पंधरा दिवसांसाठी असणार आहे अशी माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला टाळेबंदीबाबत तूर्तास दिलासा

तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

अहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री करणार औपचारिक घोषणा
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला, तरीही या निर्णयासंदर्भातली औपचारिक घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री ही घोषणा करणार आहेत. बुधवारी राज्याच्या जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री लॉकडाऊनचा अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. यावेळी नेमके निर्बंध कशा प्रकारचे असतील? अत्यावश्यक सेवांच्या संदर्भात काय नियमावली असेल? आंतरजिल्हाबंदी असेल की नाही? या साऱ्याच गोष्टींवर मुख्यमंत्री प्रकाश टाकतील.

दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार
मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. गेली वर्षभर कोरोनाच्या कारणामुळे दहावीचे वर्ग हे ऑनलाईन भरले. अशा परिस्थितीत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य झाले नाही. तसेच राज्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती या सर्व बाबी लक्षात घेता राज्य सरकारमार्फत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version