घरराजकारणमोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात

योगी आदित्यनाथ यांनी केली गर्जना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या घणाघाती भाषणांसाठी ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार १८ मे रोजी थंडावला. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी योगी आदित्यनाथ यांनी दणदणीत सभा घेतली. त्यांनी पालघर येथे महायुतीच्या उमेदवाराससाठी प्रचार करताना गर्जना केली की, तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट होईल. ते म्हणाले की, पाकिस्तानची स्थिती वाईट आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांना सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या भागातील लोकांना भारतात विलिन व्हायचे आहे. तेव्हा आपण भरघोस मतांनी नरेंद्र मोदींना विजयी करा. त्यासाठी पालघरमधील भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांना जिंकून आणा.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला साकार करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सुशासनाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, या निवडणुकीत लोक काँग्रेसचे विसर्जन करत आहेत. उत्तर प्रदेशात आता रस्त्यावर कुणीही नमाज पढत नाही. मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत.

योगींनी इंडी आघाडीवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, पाकिस्तानचे कौतुक करणाऱ्यांनी तिथे जाऊन भीक मागावी. आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत नाही. दिल्लीच्या सिंहासनावर आता रामाचा भक्तच राज्य करणार आहे. योगींनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही शरसंधान केले. ते म्हणाले की, हे म्हणत होते की, भाजपावाल्यांना १०० जन्म घ्यावे लागले तरी राम मंदिर बांधता येणार नाही. पण तरीही आम्ही विश्वासाने म्हणत होतो की, रामलल्ला येतील आणि त्यांचे मंदिर अयोध्येतच बांधले जाईल. आम्ही जे म्हटले होते ते करून दाखवले.

हे ही वाचा:

केजरीवालांबरोबर पक्षही जाणार?

भाजपावर खापर फोडत केजरीवालांनी केली ‘जेल भरो’ची घोषणा

इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे खेळाचा समतोल बिघडला; विराट कोहली नाराज

काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत

योगींनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचे अतूट नाते असल्याचेही सांगितले. काशीच्या गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक केला. छत्रपती उपाधी गागाभट्टांच्या उपस्थितीत दिली गेली. काशीत महाराष्ट्रातील राजांनी तयार केलेले अनेक घाट आहेत. आता आम्ही काशी आणि अयोध्येनंतर मथुरेकडे मार्गक्रमण केले आहे. आता तर संपूर्ण देश म्हणत आहे की, ज्यांनी रामाला आणले त्यांना आम्ही सत्तेत आणणार. यानंतर आदित्यनाथ यांनी कुर्ला येथे प्रचार केला. मुंबई उत्तर मध्यचे भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version