पश्चिम बंगालमध्ये लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार असताना मेस्सीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. पण चाहत्यांनी मेस्सीदर्शनासाठी तिकिटे काढली असतानाही कार्यक्रमस्थळी झालेल्या गोंधळामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला होता. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी युवा भारती स्टेडियममधील गोंधळलेल्या मेस्सी कार्यक्रमासाठी तिकिटे खरेदी करणाऱ्या ३३ हजार चाहत्यांचे पैसे राज्याच्या क्रीडा अर्थसंकल्पातून परत केले जातील, असे आश्वासन दिले.
लिओनेल मेस्सी यांनी १३ डिसेंबर २०२५ रोजी युवा भारती स्टेडियमला भेट दिली होती, मात्र हा कार्यक्रम गोंधळामुळे वादग्रस्त ठरला होता. तृणमूल काँग्रेस सरकारचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास यांच्या अतिप्रमाणातील हस्तक्षेप आणि व्हीआयपींच्या वर्दळीमुळे व्यवस्थापनात गोंधळ उडाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी ४,००० आणि ६,००० रुपयांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याची मागणी केली होती, मात्र ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त नबान्न येथे आयोजित विशेष राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख करताना शुभेंदू अधिकारी म्हणाले, “मेस्सीचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांनी ४,००० आणि ६,००० रुपयांची तिकिटे खरेदी केली होती. या ३३,००० क्रीडाप्रेमींनी भरलेले पैसे परत मिळावेत, अशी माझी इच्छा आहे. मी याबाबतची प्रक्रिया आधीच अंतर्गत स्तरावर सुरू केली आहे. मला आशा आहे की, हे काम पूर्ण करण्यात मला यश येईल.”
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला माजी हॉकीपटू गुरबक्स सिंग, क्रीडामंत्री इंद्रनील खान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली.
मागील सरकारवर क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, “आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या अनेक खेळाडूंच्या कागदपत्रांवर मुख्यमंत्री कार्यालयात तब्बल ११ वर्षे धूळ जमा होत होती, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.”
हे ही वाचा:
नशामुक्त युवा, ड्रग्जमुक्त भारत हाच आपला संकल्प!
एचडीएफसी बँकेला धक्का; सीईओ जगदीशन पदावरून पायउतार
समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले
पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |
ते पुढे म्हणाले, “अलीकडच्या वर्षांत ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा राष्ट्रीय संघांमध्ये पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व जवळपास दिसलेले नाही, तर ओडिशा आणि झारखंडसारखी राज्ये खेळाडू पाठवत आहेत. बंगालकडे प्रतिभा, बुद्धिमत्ता, समर्पण आणि एकाग्रता आहे, पण आवश्यक व्यवस्था, उपक्रम आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. प्रत्येक क्रीडा क्षेत्र किंवा संघटनेवर राजकारणाचे नियंत्रण का असावे? यावेळी होणारा बदल म्हणजे याच व्यवस्थेचे परिवर्तन असेल. आम्ही ते निश्चितपणे करून दाखवू.”
आपल्या सरकारचा क्रीडा क्षेत्रासाठीचा आराखडा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “आम्ही क्रीडा क्षेत्रासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प नसून आठ महिन्यांचा आहे. राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिनी इनडोअर स्टेडियम उभारण्यात येतील. त्यामध्ये टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट आणि व्यायामशाळा असतील.”
ते पुढे म्हणाले, “एका वर्षात सर्व २९४ स्टेडियम बांधणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी १०० स्टेडियम उभारण्यात येतील. सध्या अस्तित्वात असलेली स्टेडियम जीर्णावस्थेत आहेत. मागील सरकारने क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले.”
