पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरले असून, सशस्त्र भाजप समर्थकांनी कार्यालयात घुसून तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
माहितीनुसार, कोलकात्यातील कॅमॅक स्ट्रीट परिसरात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात पहाटे सुमारे ४.३० वाजता काही मुखवटाधारी व्यक्तींनी घुसून तोडफोड केली. कार्यालयातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान करण्यात आले. तसेच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांचे मोबाईलही हिसकावून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे कायद्याच्या राज्यावर झालेला लज्जास्पद हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी तब्बल दोन तास कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत या हल्ल्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. पक्षाच्या कार्यालयावर अशा प्रकारे हल्ला होणे ही केवळ तोडफोड नसून राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे एफ-१६ पाडणारे अभिनंदन हवाई दलातून निवृत्त
“सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग”
पंजाबच्या मतदार यादीत राघव चड्ढा ‘स्थलांतरित’
छोटा राजनच्या नावाने ११ कोटींची खंडणी मागणारी टोळी गजाआड
दरम्यान, भाजपने तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेत भाजपचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. काही भाजप नेत्यांनी हा प्रकार तृणमूल काँग्रेसनेच रचलेला नाट्यप्रयोग असू शकतो, असा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
