नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नेपाळमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, या संकटाच्या काळात भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या संवादाची माहिती दिली. नेपाळमधील पूरग्रस्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत भारत ठामपणे उभा आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच बचाव आणि मदतकार्यासाठी भारताच्या यंत्रणा नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून काम करत असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे वस्ती, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत १०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचेही समोर आले आहे. पुरामुळे प्रभावित भागात बचावकार्य सुरू असून, मात्र काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यात अडचणी येत आहेत. नेपाळमधील परिस्थिती पाहता भारताकडून मदत आणि बचावकार्यासाठी सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महाप्रलय! नेपाळमध्ये हाहाकार, १०५ भारतीय बेपत्ता
भारत-फ्रान्स मिळून बनवणार ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन
बाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास
मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार
भारत-नेपाळ संबंधांच्या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक आपत्तीच्या या संकटात भारताने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यात आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी भारत नेपाळसोबत समन्वय साधत राहणार असल्याचे मोदी यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
