केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख केला आणि आता नव्या पिढीने पुढे येण्याची गरज व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहोत; मात्र आता पूर्वीसारखं काम करणं शक्य होत नाही, त्यामुळे जबाबदाऱ्या हळूहळू नव्या पिढीकडे सोपवायला हव्यात, असं त्यांनी सांगितलं.
गडकरी यांच्या या वक्तव्याकडे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या अर्थाने पाहिलं जात आहे. मात्र, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली नाही. त्यांच्या वक्तव्याचा मुख्य भर नव्या नेतृत्वाला संधी देण्यावर होता. जुन्या पिढीने आपल्या अनुभवातून नव्या पिढीला मार्गदर्शन करावं आणि तरुणांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी, अशी त्यांची भूमिका दिसून आली. नव्या नेतृत्वाकडे ऊर्जा, कल्पकता आणि काम करण्याची क्षमता असते, त्यामुळे त्यांना संधी मिळणं आवश्यक असल्याचं त्यांच्या विधानातून स्पष्ट होतं.
हे ही वाचा:
“नंदीग्रामच्या हरिपूरमध्ये ८६% हिंदू, तरी घरकुल योजनेची ५४ पैकी ५२ घरे मुस्लिमांना”
सोन्याला ‘सोन्याचा भाव’; चांदीची मात्र घसरण
इराणी रियालची ऐतिहासिक घसरण; १ डॉलरच्या बदल्यात १३.७४ लाख रियाल
याच कार्यक्रमात गडकरी यांनी आदिवासी भागाच्या विकासाबाबतही महत्त्वाचं भाष्य केलं. महाराष्ट्रातील एकही आदिवासी गाव विकासापासून वंचित राहू नये, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला. आदिवासी गावांमध्ये शिक्षण, विकास आणि सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कामासाठी सरकारसोबतच समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गडकरी यांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील संघर्षाचाही उल्लेख केला. पूर्वी पक्ष आणि सामाजिक काम करताना अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगत होतो, असं त्यांनी सांगितलं. कोरोना महामारीनंतर मात्र आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली असून, आता नियमित व्यायाम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
त्यामुळे गडकरींच्या वक्तव्याचा थेट अर्थ राजकीय निवृत्ती असा लावणं घाईचं ठरेल. मात्र, अनुभवी नेतृत्वाने नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे, हा महत्त्वाचा संदेश त्यांच्या वक्तव्यातून नक्कीच समोर आला आहे.
