बिहारची राजधानी पाटण्यात विविध विद्यार्थी संघटनांचे आंदोलन मंगळवारी (२५ ऑगस्ट) अधिक तीव्र झाले. आपल्या विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून लोकभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थी संघटनांनी यापूर्वीच मुख्यमंत्री निवासाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात आधीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गांधी मैदान, जेपी गोलंबर, डाकबंगला चौक आणि आयकर गोलंबर यांसह लोकभवनाकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाकबंगला चौकात लोखंडी पत्र्यांच्या माध्यमातून विशेष बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
आंदोलक विद्यार्थी सातत्याने बॅरिकेड्सजवळ जमा होत असून लोकभवनाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वॉटर कॅनन आणि वज्र वाहनांचे पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून वॉटर कॅननचा वापर
७० व्या बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेतील कथित अनियमितता आणि परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी गांधी मैदानातून राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडल्याने पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजता गांधी मैदानातून विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू झाला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री निवास आणि राजभवनाच्या दिशेने कूच केले. मार्गावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी ही बॅरिकेड्स हटवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बिहार लोकसेवा आयोगाच्या शिक्षक भरती परीक्षा टीआरई-४ मधील निगेटिव्ह मार्किंग रद्द करणे आणि परीक्षा एकाच टप्प्यात घेणे यांचा समावेश आहे. या दोन्ही मागण्यांवर सोमवारी सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेत सहमती होऊ शकली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंगळवारी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचे दोन साथीदार अटकेत
“नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे”; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप
शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!
सोमवारी सरकारच्या निर्देशानुसार शिक्षण सचिव, पाटण्याचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी दोन ते तीन तास चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर सहमती झाली. मात्र, टीआरई-४ मधील निगेटिव्ह मार्किंग रद्द करणे आणि परीक्षा एकाच टप्प्यात घेण्यासह काही प्रमुख मागण्यांवर तोडगा निघाला नाही. विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांमध्ये बीएसएससी इंटर-लेव्हल परीक्षेची तारीख जाहीर करणे, ७०वी बीपीएससी परीक्षा रद्द करणे आणि दारोगा भरती प्रक्रियेची चौकशी करणे यांचा समावेश आहे.
