अमरावती जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी या विभागात तब्बल ३९ नवजात बाळांवर उपचार सुरू होते. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत अनेक बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशू विभागात पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. प्राथमिक तपासात उपकरणातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही अहवालांमध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात आले आहे, तर पोलिसांनी थर्मल युनिटमधील तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
आग लागलेल्या खोलीत त्या वेळी नऊ नवजात बाळे होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढले. मात्र, त्यापैकी तीन बाळांना आगीची तीव्र झळ बसली. गंभीर भाजल्यामुळे आणि धुराचा त्रास झाल्याने या तीन बाळांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी नवजात शिशू विभागात एकूण ३९ बाळे दाखल होती. हा विभाग तीन भागांमध्ये विभागलेला असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली आहे. यामध्ये रुग्णालयात जन्मलेल्या बाळांसाठी एक विभाग, बाहेरून उपचारासाठी आणलेल्या बाळांसाठी दुसरा विभाग आणि प्रकृतीत सुधारणा झालेल्या बाळांसाठी स्वतंत्र विभाग होता.
हे ही वाचा:
पाकच्या हवाई तळांवर तुर्कीच्या लष्करी विमानांची वारंवार ये-जा?
जयपूरमध्ये पाद्रीवर ईडीची छापेमारी; धार्मिक परिवर्तनासाठी निधी वापरला
राहुल गांधींकडून द्वेष, पण काँग्रेस मुख्यमंत्री शिवकुमार यांना अदानी हवेहवेसे
साखर महागली, चहादेखील ‘उकळणार’
आग लागल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. उपचारासाठी जोडलेली वैद्यकीय उपकरणे बाजूला करून बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या तातडीच्या प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली. आगीच्या घटनेनंतर गंभीररीत्या प्रभावित झालेल्या सहा नवजात बाळांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. इतर बाळांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आगीमुळे विभागात धूर पसरल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक झाले होते.
