मुंबईतील बांद्रा पश्चिम परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जॉन बॅप्टिस्ट रोडवर रविवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. कार चालवताना चालक महिला मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश रविंद्र गुप्ता हा आठ वर्षांचा मुलगा जिजामाता गार्डनजवळून रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होता. रविवारी दुपारी सुमारे २.१५ ते २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ४५ वर्षीय मेघा रावल या महिलेची इनोव्हा क्रिस्टा तिथून जात होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त होता आणि चालक महिला मोबाईलवर बोलत असल्याने तिचं लक्ष विचलित झाल्याचा आरोप आहे. कारने अंशला जोरदार धडक दिल्यानंतर तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी अंशला तातडीने होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर बांद्रा पोलिसांनी मेघा रावल यांना अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, २८१ आणि १२५, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांमध्ये सदोष मनुष्यवध, बेदरकार वाहन चालवणे आणि धोकादायक ड्रायव्हिंगशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे.
हे ही वाचा:
बटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला…
मैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!
भारत – उझबेकिस्तान संबंधांना युरेनियमचे नवे इंधन
कोलकाता बिलबोर्ड वादात अभिषेक बॅनर्जींना पोलिसांचे समन्स
या प्रकरणाचा पुढील तपास बांद्रा पोलीस करत असून, कारचा वेग आणि अपघाताच्या वेळी चालक मोबाईलवर बोलत होती का, याबाबत अधिक तपास केला जात आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालवण्याच्या निष्काळजीपणामुळे एका चिमुकल्याचा जीव गेल्याने बांद्रा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
