दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन देशभर चर्चेत आल्यानंतर सुमारे महिनाभराने ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने २५ जुलै रोजी विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत ५ सप्टेंबर रोजी इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालय असा युवा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाने सोमवारी केली. पण यावेळी शांततापूर्ण मोर्चा असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. हा मोर्चा शांततापूर्ण असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ‘जेन झेड’, तरुण आंदोलक आणि आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी झालेला ‘विश्वासघात’ स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हे ही वाचा:
कुस्तीचा वारसा, तीन सुवर्णपदकांचा इतिहास
जुरेलच्या शतकानंतर ‘जय जवान-जय किसान’चा नारा
काश्मिरी पंडितांची नाव-पत्त्यासह नंबर असलेली यादी दहशतवाद्यांकडून जारी
दिल्ली पावसाने बेहाल; रस्ते जलमय, विमानसेवाही कोलमडली
सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केंद्र सरकार २५ जुलै रोजी तरुण पिढीला दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करणार आहे की नाही, याबाबत गंभीर शंका व्यक्त केली असल्याचे दास यांनी सांगितले.
त्यामुळे शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चाचे नेतृत्व आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींच्या कुटुंबीयांकडून आणि २० जुलै रोजीच्या कथित पोलिस बळाचा वापर झालेल्या घटनेतील पीडितांकडून करण्यात येणार असल्याचे सीजेपीने म्हटले आहे.
सीजेपीचे आंदोलन २० जून रोजी जंतरमंतरवर सुरू झाले होते. परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेले आंदोलन नंतर देशातील इतर भागांतही पसरले. २० जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केल्याचा सीजेपीचा आरोप असून, या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे पक्षाने म्हटले होते.
