नेपाळ-तिबेट सीमेवरील ग्यिरोंग येथील इमिग्रेशन इमारत चिखल, दगड आणि पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने गिळंकृत केल्याचे दृश्य बुधवारी शहरांमध्ये आणि गावांमध्ये धडकलेल्या विनाशकारी अचानक पुराच्या भीषणतेची पहिली झलक देणारे ठरले. या पुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यात ईशा फाउंडेशच्या श्रीदेवी वेजेला या अजूनही सापडलेल्या नाहीत. त्यांचे पती अमेरिकेहून आता भारतात आले आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. १३ वर्षांचा मुलगाही भारतातच आहे.
तिबेटमधील इमिग्रेशन केंद्रात असलेल्यांमध्ये श्रीदेवी वेजेला यांचाही समावेश होता. त्या दीपक डांडू यांच्या पत्नी असून सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशनच्या ८० सदस्यांच्या गटासोबत कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवराच्या यात्रेवरून परतत होत्या. त्याचवेळी महाभयंकर अशी ती लाट इमारतीवर कोसळली.
पत्नीचा शोध सोडून न देता अमेरिकन नागरिक डांडू यांनी न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबादसाठी विमान पकडले. त्यांनी सीबीएस न्यूजशी बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी या गटाचा भाग होती आणि पूर इमारतीत घुसला तेव्हा ती ग्यिरोंग येथील इमिग्रेशन इमारतीमध्ये होती.
हे ही वाचा:
पॅकेज्ड फूडवर आता समोरच दिसणार ‘जास्त साखर’, ‘जास्त मीठा’ची चेतावणी?
कंगना-बाबा रामदेव आता झाले बहीणभाऊ
गिलकडून पडिक्कल-सुथारचं कौतुक-+
आपत्ती येण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी, गट इमिग्रेशन केंद्रात प्रवेश करत असताना गटप्रमुख ईशा फाउंडेशनच्या संपर्कात होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. “त्यानंतर संपर्क पूर्णपणे तुटला,” असे त्यांनी सीबीएस न्यूजला सांगितले.
डांडू मंगळवारपर्यंत आपल्या पत्नीच्या सतत संपर्कात होते. त्यानंतर तिने आपण परतीच्या प्रवासाला निघाल्याचे सांगितले आणि त्यानंतर सर्व संपर्क बंद झाला. श्रीदेवी हैदराबादला परतणार होत्या. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा, जो तिच्यासोबत भारतात आला होता, तो कुटुंबीयांसोबत तिथेच थांबला होता.
“तो हे सर्व खूप कठीण परिस्थितीतून अनुभवत आहे, सर्व बातम्या ऐकत आहे,” डांडू यांनी आपल्या मुलाबद्दल सांगितले. “मला वाटते की तो खूप अस्वस्थ आहे. मला तिथे जाऊन त्याच्यासोबत राहायचे आहे.”
डोळ्यांत अश्रू आणि दाटून आलेल्या आवाजात डांडू यांनी सांगितले की, कैलास मानसरोवर यात्रा करणे हे श्रीदेवी यांचे “आयुष्यभराचे स्वप्न” होते. मलाही जायचे होते, पण आता काय करणार… म्हणजे ही अत्यंत कठीण परिस्थिती आहे.
गुरुवारी ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव (सद्गुरू) यांनी आपल्या अनुयायांना माहिती देताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या गटातील कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणारे ८० सदस्य महापुराच्या लोंढ्याने इमारत वाहून जाण्याच्या काही क्षण आधी इमिग्रेशन इमारतीत होते, असे त्यांनी सांगितले. पार्श्वभूमीवर अनुयायांचे आक्रोश आणि रडण्याचे आवाजही ऐकू येत होते.
“ही एक भयंकर आणि असाधारण घटना आहे,” असे ते त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये डोळ्यांतून अश्रू वाहत असताना म्हणताना दिसले.
“आमच्या गटांपैकी एक, एस३ गट, ज्याला आम्ही सागा येथे भेटलो होतो आणि ट्रेकिंग करताना देखील भेटलो होतो, तो खाली परतत होता,” असे त्यांनी सांगितले. पूर येण्याच्या नऊ मिनिटे आधी फाउंडेशनचा गटप्रमुखाशी शेवटचा संपर्क झाला होता, असेही त्यांनी म्हटले.
“सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांनी त्याने संदेश पाठवला की ते इमिग्रेशन केंद्रात पोहोचले आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी ही घटना घडली,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जर तो सीमा ओलांडून आला असता, तर त्याचा नेपाळचा फोन सक्रिय झाला असता. पण तो झाला नाही. म्हणजे अक्षरशः संपूर्ण गट त्या इमारतीत होता.”
मृतांचा आकडा ५७९ वर
मध्य नेपाळमधील अचानक आलेल्या पुरातील मृतांचा आकडा शुक्रवारी ५७९ वर पोहोचला. आणखी मृतदेह सापडल्यानंतर आणि काही काळ मंदावलेल्या शोध व बचाव मोहिमा पुन्हा पूर्ण वेगाने सुरू झाल्यानंतर हा आकडा वाढला.
