पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत बांद्रा टर्मिनस आणि गोरखपूरदरम्यान धावणारी विशेष ट्रेन आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०५०५४/०५०५३ बांद्रा टर्मिनस–गोरखपूर स्पेशल आता सुधारित क्रमांक १५०८६/१५०८५ बांद्रा टर्मिनस–गोरखपूर अमृत भारत साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून नियमित धावणार आहे. त्यामुळे मुंबईसह उत्तर प्रदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १५०८६ बांद्रा टर्मिनस–गोरखपूर साप्ताहिक एक्सप्रेस दर शनिवारी रात्री ९.४५ वाजता बांद्रा टर्मिनसहून सुटेल. ही ट्रेन सोमवारी सकाळी ६.४५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. या ट्रेनची नियमित सेवा २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक १५०८५ गोरखपूर–बांद्रा टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दर शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता गोरखपूरहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता ही ट्रेन बांद्रा टर्मिनसला पोहोचेल. या दिशेची नियमित सेवा २८ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे.
मुंबई ते गोरखपूरदरम्यान धावणारी ही ट्रेन मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. दोन्ही दिशांना बोरीवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, कोटा, गंगापूर सिटी, बयाना, आग्रा फोर्ट, टूंडला, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद येथे या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.
या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास तसेच जनरल सेकंड क्लासचे डबे असणार आहेत. नियमित सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांसाठी गोरखपूरकडे जाण्या-येण्याचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, ट्रेन क्रमांक १५०८६/१५०८५ साठी आरक्षण २६ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना सर्व पीआरएस काउंटर तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करता येणार आहे. ट्रेनचे वेळापत्रक, थांबे आणि रेक संरचनेची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
