भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये १०० टक्के भारतीय घटक आणि कच्च्या मालापासून तयार करण्यात आलेल्या एके-२०३ ‘शेर’ असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही रायफल भारत-रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) मार्फत तयार करण्यात आली आहे.
२३ ऑगस्ट रोजी या रायफलची फायरिंग चाचणी घेण्यात आली. यात बर्स्ट फायरिंगसह प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्याचे कंपनीने सांगितले. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे रायफलमधील प्रत्येक घटक आणि वापरण्यात आलेला कच्चा माल भारतीय उद्योगांकडून मिळवण्यात आला आहे. त्यामुळे ही केवळ काही सुट्या भागांचे स्थानिकीकरण नसून संपूर्ण रायफलचे स्वदेशीकरण असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आता कंपनीकडून आवश्यक संख्येने स्वदेशी प्रोटोटाइप तयार केले जात असून, सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय लष्कराकडे चाचणीसाठी रायफल्स सुपूर्द केल्या जाणार आहेत. लष्कराच्या चाचण्यांमध्ये रायफलची कामगिरी आणि तांत्रिक गरजांची पूर्तता तपासली जाईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
‘शेर’मध्ये काय विशेष?
एके-२०३ ही प्रसिद्ध कलाश्निकोव्ह कुटुंबातील ७.६२×३९ मिमी कॅलिबरची असॉल्ट रायफल आहे. तिचा फायरिंग वेग सुमारे ७०० राऊंड प्रति मिनिट, तर प्रभावी फायरिंग रेंज सुमारे ८०० मीटर असल्याचे उपलब्ध माहितीत नमूद करण्यात आले आहे. आधुनिक डिझाइन आणि मॉड्युलर रेल सिस्टीममुळे विविध उपकरणे बसवण्याची सुविधाही या रायफलमध्ये आहे.
अमेठीतील एके-२०३ प्रकल्पाची सुरुवात भारत-रशिया संरक्षण सहकार्याच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला उत्पादनात आयात केलेल्या घटकांवर अवलंबित्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय घटकांचा वापर सातत्याने वाढवण्यात आला आणि आता १०० टक्के स्वदेशी उत्पादनाचा टप्पा गाठण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योग, पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षमतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
काश्मिरी पंडितांची नाव-पत्त्यासह नंबर असलेली यादी दहशतवाद्यांकडून जारी
३० हजार कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटप्रकरणी मुंबईत दोघांना अटक
वंधामातील २३ काश्मिरी पंडितांच्या हत्येचे गूढ उलगडणार?
बलुचिस्तानात पाक सैन्यावर हल्ला; १३ ठार
IRRPL लवकरच दर १०० सेकंदाला एक एके-२०३ रायफल तयार करण्याची उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. भारतीय लष्करासाठी मोठ्या प्रमाणावर रायफल्स तयार करण्याबरोबरच या प्रकल्पामुळे भविष्यात भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी निर्यातीच्या संधीही वाढू शकतात.
