पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील तणाव आणि जहाजवाहतुकीवरील मर्यादा यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र अशा परिस्थितीत दोन भारतीय एलपीजी वाहक जहाजांनी सुरक्षितपणे हा मार्ग पार केला असून ते लवकरच भारतात पोहोचणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन जहाजांवर एकूण सुमारे ९२,७०० टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (LPG) आहे. ही जहाजे गुजरातमधील बंदरांवर १६ आणि १७ मार्च रोजी पोहोचण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या जहाजांनी सुरक्षितपणे मार्ग पार करणे भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ची पुन्हा शिट्टी वाजली!
“काँग्रेस म्हणजे भारताच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्तींच्या हातातील बाहुली”
स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. पर्शियन गल्फमधून जगभर पाठवले जाणारे तेल आणि वायू यातील मोठा भाग या मार्गाने जातो. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक या मार्गावर अवलंबून असल्यामुळे येथे निर्माण होणारा कोणताही तणाव जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करतो.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या कारवाईनंतर इराणकडून प्रत्युत्तरात्मक हालचाली झाल्याने या परिसरात संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जहाजे या मार्गावर अडकून पडली होती. भारताने इराणसह विविध देशांशी राजनैतिक चर्चा करून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांनंतर काही भारतीय जहाजांना पुढे जाण्याची परवानगी मिळाली.
भारतातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या पुरवठ्याबाबत काही प्रमाणात चिंता निर्माण झाली होती. कारण भारताच्या एलपीजी आयातीपैकी मोठा भाग पश्चिम आशियातून येतो. या पार्श्वभूमीवर लोकांनी मोठ्या प्रमाणात सिलिंडर बुकिंग केल्याचेही दिसून आले. मात्र सरकारने नागरिकांना घाबरून जाऊन अतिरिक्त सिलिंडर बुक करू नये, असे आवाहन केले आहे.
सरकारकडून सांगण्यात आले आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एलपीजीचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) वापरण्याचा पर्याय वाढवण्यावरही भर दिला जात आहे, ज्यामुळे घरगुती एलपीजीवरील दबाव कमी होईल.
दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे अजूनही अनेक जहाजे त्या परिसरात अडकून असल्याचे वृत्त आहे. भारत सरकार या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तथापि, दोन भारतीय जहाजांनी मोठ्या प्रमाणात एलपीजी घेऊन सुरक्षितपणे मार्ग पार केल्याने भारताच्या ऊर्जा पुरवठ्याबाबत तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
