बीडमधील ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

४ कोटी ७३ लाख रुपयांची देणगी जमा केल्याचे तपासात उघड

बीडमधील ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ‘गुलजार-ए-रजा’ या बनावट ट्रस्टचे कथित पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या बीड युनिटने काही महिन्यांपूर्वी माजलगाव येथे या बनावट ट्रस्टचा भंडाफोड केला होता. या संस्थेने ५ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तब्बल ४ कोटी ७३ लाख रुपयांची देणगी जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बनावट ट्रस्टचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘अल हलिमी’ या दुसऱ्या एका बनावट ट्रस्टशी थेट आर्थिक संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीतील ‘अल हलिमी’ ट्रस्टचे पाकिस्तानमधील वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’ या संस्थेशी आणि दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी कथित संबंध असल्याचा संशय आहे. बार्शी येथील या ट्रस्टनेही अशाच प्रकारे तब्बल १० कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचे उघड झाले होते. आता या दोन्ही ट्रस्टमधील परस्पर आर्थिक व्यवहार, निधीची देवाणघेवाण आणि त्याचा मूळ उद्देश काय होता, याची पडताळणी एटीएस करत आहे. या प्रकरणात काही आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोन्ही संस्थांच्या संपर्कात आलेले तरुण सध्या काय करत आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध ही पोलीस घेत आहेत.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारने ‘गुलजार-ए-रझा’ ट्रस्टविरोधात कायदेशीर कारवाई तीव्र केली आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि संशयास्पद व्यवहार समोर आल्यानंतर या संस्थेची सर्व बँक खाती तातडीने गोठवण्यात आली आहेत. धार्मिक आणि धर्मादाय कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून तो इतरत्र वळवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. प्राथमिक तपासात या दोन्ही संस्थांची कायद्यानुसार योग्य नोंदणी झालेली नसल्याचे आणि बनावट कागदपत्रे तसेच पॅन कार्डचा वापर करून बँक खाती उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे सध्या फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून, कोणत्याही धार्मिक किंवा धर्मादाय व्यासपीठाचा वापर आर्थिक गैरव्यवहारासाठी किंवा देशविरोधी कृत्यांसाठी केला गेल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका तपास यंत्रणांनी घेतली आहे.

हे ही वाचा:

पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही

आता शेतकरी दिल्लीच्या दिशेने!

युक्रेन जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू

जंतर-मंतरवर राजकारण, नीट देणारे खरे विद्यार्थी मात्र अभ्यासात!

Exit mobile version