रेल्वे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घाटकोपर येथे घडली. १६०० मीटर धावण्याची मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर तो अचानक कोसळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अक्षय मिसाळ (३०) असे मृत तरुणाचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. रेल्वे पोलीस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. यापूर्वी दोन वेळा प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याने यंदा तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता. भरतीसाठी तो मुंबईत आला होता.
हे ही वाचा:
‘राहुल गांधींना चॅटजीपीटीही विकृत ठरवते!’
अमेरिकन विमानवाहू नौकेतच मूलभूत सुविधांचा बोजवारा
घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर सोमवारी सकाळी मैदानी चाचण्या सुरू होत्या. सकाळी सुमारे दहा वाजता १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अक्षय मैदानाच्या एका बाजूला येऊन बसला. त्यानंतर त्याला भोवळ येऊन तो खाली पडला. उपस्थितांनी तात्काळ त्याला राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपमृत्यूची नोंद केली. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत स्पष्टता नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
